रत्नागिरी:- शहरानजीकच्या मिरजोळे-एमआयडीसी येथील रेल्वे ब्रिज तसेच आरटीओ ऑफीस समोरील रेल्वे रुळावर असे दोन मृतदेह सापडून आले. ही घटना मंगळवार 29 एप्रिल रोजी रात्री 8.30 ते 9.30 वा. कालावधीत उघडकीस आली आहे. यातील आरटीओ कार्यालयासमोरील रेल्वे रुळावर सापडून आलेल्या मृदेहाची ओळख पटली असून त्याचे नाव दत्ता बिरा यमगर (34,मुळ रा.सांगोला,सोलापूर सध्या रा.कुवारबाव,रत्नागिरी) असे आहे.
मंगळवारी रात्री रेल्वे पोलिसांना मिरजोळे एमआयडीसी येथील रेल्वे ब्रिजवर तसेच आरटीओ कार्यालयाच्या समोरील रेल्वे रुळावर अज्ञात तरुणांचे मृतदेह दिसून आले. एमआयडीसी रेल्वे ब्रिजवर सापडून आलेल्या मृतदेहाच्या शरीरावरुन रेल्वे गेल्याने त्याचे शिर धडापासून वेगळे झालेले होते. याबाबत रेल्वे पोलिसांनी ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. तर आरटीओ येथील रेल्वे रुळावर सापडून आलेल्या मृतदेहाची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. दोन्ही पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचार्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहांचे पंचनामे करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवले. या तरुणांनी रेल्वे खाली आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून याबाबत ग्रामीण व शहर पोलिस ठाण्यात आकस्मिकम मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास ग्रामीणचे पोलिस उपनिरीक्षक कदम आणि शहर पोलिस ठाण्याचे पोलिस हेेड काँस्टेबल गायकवाड करत आहेत.