रत्नागिरीत तुफान पाऊस; काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडली

रत्नागिरी:- भारतीय वेधशाळेने 14 आणि 15 जून रोजी रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर केला. त्यानुसार संध्याकाळपासून पावसाने रत्नागिरी तालुक्याला झोडपून काढलं. रत्नागिरी शहरातील बाजारपेठेत पावसाचे पाणी शिरले तर काजळी नदी देखील धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे.

रविवारी दिवसभर पावसाने विश्राती घेतली होती. मात्र सायंकाळी जोरदार पाऊस सुरु झाला. रात्री पावसाचा वेग वाढला. वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत होता. तालुक्यातील काजळी नदीला पूर आला असून पाणी चांदेराई बाजारात भरण्याची शक्यता आहे. दरम्यान सोमेश्वर मोहल्ला नदीचे पाणी पात्राबाहेर वाहू लागलं आहे. लोक सतर्क झाले आहेत.

रत्नागिरी शहरात अनेक सखल भागात पाणी भरले असून पाणी लोकांच्या घरात घुसले. नगर पालिकेने गटारांची न केलेली कामे आणि खोदून ठेवलेले रस्ते याचा मोठा फटका शहरवासीयांना बसू लागला. रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई येथेही पाणी भरू लागले असून नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. पावसाचा हा जोर कायम राहिला तर पाणी पुलावरून जाण्याची शक्यता आहे. चांदेराई येथे NDRF चे पथक दाखल झाले असून तलाठी घटनास्थळी रवाना झाले आहेत.