रत्नागिरीत काजळी नदीला पूर; हरचेरी, चांदेराई बाजारपेठ पाण्याखाली

रत्नागिरी:- रत्नागिरीत पौर्णिमेच्या मुहूर्तावर पावसाचा जोर चांगलाच वाढला. रविवारी सकाळपासून मुसळधार पावसाने रत्नागिरी तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. मुसळधार पावसासोबत रविवारी दुपारी समुद्राला आलेले उधाण यामुळे किनारपट्टी भागात मोठे नुकसान झाले. किनारपट्टी भागात उधाणाच्या लाटा उसळत होत्या. अनेक ठिकाणी रहिवासी भागात समुद्राच्या पाण्याने शिरकाव केल्याने किनारपट्टी भागातील रहिवाशांच्या मनात धडकी भरली होती.

मागील काही दिवस कोसळणार्‍या मुसळधार पावसाने रत्नागिरील रविवारी दिवसभर चांगलेच झोडपून काढले आहे. रत्नागिरीत सलग दोन दिवस धुवॉंधार पाऊस कोसळला. या पावसामुळे रविवारी सकाळी काजळी नदीला पूर आला. यामुळे हरचेरी आणि चांदेराई बाजारपेठ पुराच्या पाण्याखाली गेली.

दरवर्षी पावसाळ्यात चांदेराई बाजारपेठेत पुराचा धोका निर्माण होतो. यापूर्वी काजळी नदीतील गाळ उपसादेखील झाला होता. मात्र हा उपसा व्यवस्थित न झाल्याने पुराची भीती अद्यापही कायम आहे. रविवारी सकाळपासूनच रत्नागिरीत धुवॉंधार पाऊस कोसळत होता. त्यातच हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला होता. रविवारी पहाटे पासून काजळी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली. बघता – बघता पाणी पुलापर्यंत टेकले. रविवारी सकाळी बाजारपेठेत पाणी शिरण्यासाठी सुरुवात झाली. पाण्याचा प्रवाह वाढताच व्यापाऱ्यांनी आपला माल सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली. हरचेरी आणि चांदेराई बाजारपेठेत पुराचे पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठी हानी झाली. तसेच पोमेंडी आणि सोमेश्वर या ठिकाणी देखील पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती. चांदेराई येथील काजळी नदीच्या पात्रात पाण्याचा प्रवाह सकाळी अचानक वाढला. त्यामुळे येथील व्यापार्‍यांच्या पोटात भीतीचा गोळा निर्माण झाला होता.

मुसळधार पावसासोबत रविवारी दुपारी समुद्राला मोठी भरती आली. भरती सोबत उधाणाच्या मोठमोठ्या लाटा किनारपट्टी भागात येऊन आदळत होत्या. रत्नागिरीतील मिऱ्या येथील बंधाऱ्यावर अजस्त्र लाटा येऊन आदळत होत्या. यासह मांडवी, भाट्ये, काळबादेवी, पूर्णगड या भागातही समुद्राच्या भरतीचे पाणी काही प्रमाणात रहिवासी भागात शिरले होते.