रत्नागिरीत उद्या पहाटे वादळ धडकण्याची शक्यता: ना. सामंत

रत्नागिरी:- फियान वादळाची कटु आठवण आपल्या गाठिशी आहे. त्यामुळे ‘तौक्ते’ वादळाबाबत जिल्हा प्रशासन खबरदारीचे उपाय योजत वादळाला तोंड देण्यासाठी सज्ज आहे. आज संध्याकाळी सिंधुदुर्ग आणि उद्या पहाटे रत्नागिरी किनारपट्टीवर हे वादळ धडकण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिणमंत्री उदय सामंत यांनी केले. परिस्थिती पाहून किनापट्टीभागातील नागरिकांच्या स्थलांतराचा विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

झुम अ‍ॅपद्वारे झालेल्या पत्रकार परिषदेत सामंत म्हणाले, तौक्ती वादळाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने वादळाला तोंड देण्यासाठी नियमावली तयार केली आहे. किनारपट्टी भागातील नागरिकांनी सतर्क राहुन सहकार्य करावे. मच्छीमारांना आवाहन केल्यामुळे 100 टक्के मच्छीमार किनार्‍यावर आले आहेत. किनार्‍यावर आलेल्या खलाशांची कोरोना चाचणी केली जाईल. सध्या वादळ केरण किनारपट्टीवरून पुढे सरकत आहे. आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत सिंधुदुर्गात तर उद्या (ता. 16) पहाटे 5 वाजेपर्यंत वादळ रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. दोन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एनडीआरएफ टिमच्या संपर्कात आहेत. पोलिसांना, महसूल खाते यांना सूचना देण्यातआल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन बैठका या संदर्भात घेतल्या आहेत. प्रत्येकाने काळजी घ्या.

नैसर्गिक आपत्ती असल्याने प्रशासनाने पूर्वतयारी केली आहे. विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या शक्यनेते सर्व कोविड सेंटर, रुग्णालयांच्या ठिकाणी जनरेटर सुविधा करण्यात आली आहे. ज्या क्षणाला प्रशासनाला आपली गरज लागेल तेथे मदत करावी, कोणत्याही परिस्थितीत जीवितहानी होणार नाही, यादृष्टीने आमचा प्रयत्न आहे. आयत्यावेळी किनारीभागातील नागरिकांचे स्थलांतर करावे लागले तरी त्याची तयारी झाली आहे. मात्र सुदैवाने अशी कोणतीच वेळ येऊ नये, वादळ खोल समुद्रात जावे, अशी प्रार्थना आपण सर्वांनी करुया, असे उदय सामंत म्हणाले.

पाच किनारी तालुक्यांना तडाखा जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात वादळाचा जास्त प्रभाव असण्याची शक्यता आहे. फयान वादळाचा अनुभव विचारात घेता झाडे पडण्याची शक्यता आहे. म्हणून लाकूड कापण्याचे कटर मशिन, जेसीबी, डंपर, ट्रॅक्टर आदी यंत्रणा तयार ठेवण्यात आली आहे. रत्नागिरी, राजापूर, दापोली, मंडणगड, गुहागर या किनारी भागाला तडाखा बसण्याची शक्यता आहे. रत्नागिरी तालुक्यातील 104 गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. रत्नागिरी शहरातील नागरिकांनाही खबरदारीच्या सूचना केल्या आहेत, असे सामंत यांनी सांगितले.