रत्नागिरीतील 37 गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या प्रादेशिक नळपाणी योजनेच्या कामाला गती

रत्नागिरी:- मिर्‍या, शिरगाव, निवळीसह एकूण 37 गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी नव्याने उभारण्यात येणार्‍या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या कामाने गती घेतली आहे. 135 कोटी 73 लाख रुपयांची ही नळपाणी योजना असून त्यासाठी वळके मराठवाडी व साठरे ठोंबरेवाडी येथे कोल्हापूर टाईप बंधारा बांधण्यात येणार आहे. त्यामुळे रत्नागिरी शहरालगतच्या गावांचाही पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

रत्नागिरीचे पालकमंत्री व स्थानिक आमदार उदय सामंत यांनी रत्नागिरीवासीयांच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांकडे लक्ष दिले आहे. या 37 गावांच्या योजनेमुळे पाण्याचा भविष्यातील तीस वर्षाचा प्रश्न निकाली निघणार आहे. 37 गावांमध्ये उन्हाळ्यात येणाऱ्या कमीजास्त पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे. ही योजना झाल्यावर वरील गावात दररोज माणशी 55 लिटर पाणी उपलब्ध होणार आहे.

मिर्‍या, शिरगाव ते निवळी तिठापर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजुच्या गावांचा समावेश यात करण्यात आलेला आहे. मागील काही वर्षात साळवी स्टॉप ते निवळी तिठापर्यंत शहरीकरण वाढत असून लोकवस्तीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांना सुविधा देण्यासाठी ना. सामंत यांनी विशेष लक्ष दिले.

आहे. 135 कोटी 73 लक्ष रुपयांची ही योजना असून या योजनेसाठी बावनदीवर वळके मराठवाडी येथे 6 मीटर उंच कोल्हापूर टाईप बंधारा बांधला जात आहे. त्यानंतर भविष्यातील मागणी विचारात घेऊन आणखी पाण्यासाठी साठरे ठोंबरेवाडी नजीक दुसरा बंधारा बांधला जाणार आहे. या धरणांवरती 13 मीटर व्यास व 13 मीटर खोलीची जॅकवेल उभारली जाणार आहे. त्याठिकाणी 270 हॉर्सपॉवरच्या तीन पंपातून सुमारे 7 किलोमीटर अंतरावर वेळवंड येथे जलशुध्दीकरण केंद्रात आणून शुध्द पाणी पुढे आणले जाणार आहे. यासाठी 15 दलघमी क्षमतेचे शुध्दीकरण केंद्र उभारले जात आहे.

45 टाक्यांची उभारणी

वेळवंडवरुन थेट निवळी तिठा येथे 24.70 लाख क्षमतेच्या पाण्याची साठवण टाकीत पाणी आणून करबुडे, निवळी, हातखंबा, खेडशी, नाचणे, पानवळ येथे साठवण टाक्यात उभारुन तेथून प्रत्येक गावच्या पाणी टाकीत पाणी सोडले जाणार आहे. यासाठी एकूण 45 पाण्याच्या टाक्यांची उभारणी केली जाणार आहे. यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत 129 किलोमीटरची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे.