रत्नागिरीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा 10 जुलैला मेळावा; राजन साळवींचा होणार सन्मान

रत्नागिरी:- रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा भव्य मेळावा 10 जुलैला सायंकाळी 4 वाजता स्वामी समर्थ मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात शिवसेनेचे उपनेते आमदार डॉ. राजन साळवी यांचा सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

येथील खासदार संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. शिवसेनेच्या मेळाव्याला खासदार विनायक राऊत, शिवसेनेचे संपर्कप्रमुख सुधीर मोरे आदी उपस्थित राहणार आहेत. रत्नागिरी तालुका शिवसेना कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह संघटनेसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षात राहतील त्या सर्वांना घेऊन भविष्यात पुढे जायचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धनुष्यबाण निशाणी घेऊन उभे राहणार्‍या सर्व उमेदवारांना विजयी करून भगवा झेंडा फडकावण्याचा मानस जिल्हाप्रमुख चाळके यांनी व्यक्त केला. शिवसेना बळकट करण्यासाठी हा मेळावा ंमहत्वाचा आहे असे त्यांनी सांगितले. भातशेतीची कामे सुरू असल्याने यापूर्वी दोनवेळा आयोजित केलेला मेळावा स्थगित केला होता. येत्या चार दिवसात भातशेतीची कामे पूर्ण होणार असून 10 जुलैला मेळावा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शनिवारी (ता. 2) झालेल्या तालुका कार्यकारीणीला सर्व पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे रत्नागिरीतील शिवसैनिक फुटलेले नाहीत असा विश्‍वास बंड्या साळवी यांनी व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय साळवी, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, शहर संघटक प्रसाद सावंत, माजी नगराध्यक्ष मधुकर घोसाळे, विभागप्रमुख शेखर घोसाळे आदी उपस्थित होते.

आमदार उदय सामंत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत गेले आहेत. आमदार सामंत यांनी आपण शिवसेनेतच राहणार असल्याचा निर्वाळा दिला आहे. त्यांच्या संपर्क कार्यालयातील फलकावर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे आदींचे फोटो आजही कायम आहेत. भविष्यातील राजकीय निर्णय आमदार सामंत लवकरच जाहीर करतील. ते कदाचित शिवसेनेतही राहतील असा आशावाद तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी व्यक्त केला.