रत्नागिरी:- रत्नागिरी येथील तरूणाचा कोल्हापूर येथे टँकरच्या धडकेत अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवार 16 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली. कृष्णात खेमराज बेगडा ( ३० मूळ गाव रत्नागिरी सध्या रा. बालिंगे ता. करवीर) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, कृष्णात हा आपल्या दुचाकीवरून सकाळी ८ च्या सुमारास दोनवडे येथील हॉटेलकडे निघाला असता कोल्हापूरकडून येणाऱ्या गोकुळसाठी दूध आणणाऱ्या टँकरने (एम एच ०९ जीजे ४१४९) त्याला समोरासमोर धडक दिली. या धडकेत कृष्णात हा जागीच ठार झाला. कृष्णात हा महादेव प्रसाद हॉटेल, दोनवडे येथे कुक म्हणून काम करतो. खुपीरे ग्रामीण रुग्णालयातील कार्यरत मावस भावाकडे तो आला होता.
अपघातानंतर टँकर चालक पळून गेला असून अधिक तपास करवीर पोलीस करीत आहेत. गाडी नंबर रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील सोशल मीडियाच्या माध्यमातून सदरच्या अपघाताची पोस्ट आज दिवसभर वायरल झाली होती. अपघाताचे दृश्य इतके विदारक होते की मृतदेह पाहून लोक हळहळ व्यक्त करीत होते. रत्नागिरीत ही घटना कळल्यानंतर नातेवाईकांनी कोल्हापूरकडे धाव घेतली.