Saturday, May 23, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची मुंबईत बदली

रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची मुंबईत बदली

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची अप्पर पोलीस आयुक्त, विशेष शाखा, मुंबई येथे बदली झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या बदलीचे आदेश प्राप्त झाले.

आपल्या कार्यकाळात पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी रत्नागिरी जिल्ह्यात गुन्हेगारीला प्रभावीपणे आळा घातला. त्यांनी अंमली पदार्थांच्या तस्करीवर कठोर कारवाई करत मोठे यश मिळवले. त्यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी अनेक ठिकाणी धाडी टाकून मोठ्या प्रमाणात विदेशी मद्याचा साठा जप्त केला. यासोबतच, जिल्ह्यात घडलेल्या अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांची उकल करण्यातही त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांना यश आले.

श्री. कुलकर्णी यांनी रत्नागिरी जिल्ह्यासोबत अल्पावधीतच आपलेपणाचे नाते जोडले होते. त्यांच्या सक्षम नेतृत्वाखालीच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जिल्ह्यात शांततेत पार पडल्या. त्यांनी केवळ आपली कर्तव्य म्हणून जबाबदारी सांभाळली नाही, तर रत्नागिरीतील सामान्य नागरिकांशीही त्यांनी उत्कृष्ट संवाद आणि संबंध ठेवले. एक उत्कृष्ट आणि लोकाभिमुख अधिकारी म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिक नेहमीच त्यांना आदराने स्मरणात ठेवतील. त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था उत्तम राहिली, याची नागरिकांनी नेहमीच प्रशंसा केली.

गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांवर वचक ठेवणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या बदलीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांमध्ये काहीशी नाराजी दिसून येत आहे. मात्र, त्यांच्या पुढील वाटचालीस नागरिकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईतील त्यांच्या नवीन जबाबदारीतही ते यशस्वी होतील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.