सांडव्यावरून विसर्ग सुरू
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरासाठी वरदान ठरणाऱ्या शीळ धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे शहराची पाणीटंचाईची समस्या कायमची संपुष्टात आली आहे. मंगळवार ३० जून रोजी सकाळी ६ वाजता शीळ धरण १०० टक्के भरले असून, धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे.
धरणात सद्यस्थितीत १२०.३५ मीटर इतकी पाणी पातळी असल्याची माहिती पाणी सभापती निमेश नायर यांनी दिली. तसेच सांडव्यावरील विसर्ग देखील २.१८ घमी/से. (घनमीटर प्रति सेकंद) असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी आणि परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. अखेर मंगळवारी सकाळी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने रत्नागिरीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग सुरू झाल्याने प्रशासनाकडून परिसरातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असला तरी, शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.









