संचालक- कामगारांची मुंबईत झाली शनिवारी उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक
रत्नागिरी:- जे. के. फाईल्स कंपनी बंद करण्याच्या प्रशासनाच्या हालचालीनंतर कामगारांना योग्य मोबदला मिळावा यादृष्टीने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत कंपनीचे संचालक व कामगार प्रतिनिधींची बैठक मुंबईमध्ये झाली. यात कामगारांनी किमान 25 लाख रुपये मिळावेत अशी मागणी लावून धरली. या मागणीला संचालक मंडळाकडून फारसा प्रतिसाद मिळाला नसला तरी यातून निश्चित मार्ग निघेल असा विश्वास कर्मचारी प्रतिनिधींनी व्यक्त केला.
जे. के. फाईल्स इंजिनिअरींग कंपनीने स्वेच्छा निवृत्ती योजना लागू करताना सात लाख व अन्य फायदे देण्याचे जाहीर केले. परंतु निवृत्तीला आलेल्या कामगारांना यातून दहा लाख रुपयेही मिळत नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे कामगारांमध्ये नाराजी होती. यातच अनेक कामगारांनी कंपनी बंद करु नये अशी मागणी केली होती. परंतु कंपनी तोट्यात जात असल्याने चालवण्यास असमर्थता दर्शवण्यात आली होती. त्यामुळे सर्व कामगारांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या होत्या. त्यामुळे ना. सामंत यांनी कामगारांच्यावतीने मुंबईमध्ये बैठकीचे आयोजन केले होते.
शनिवारी झालेल्या या बैठकीत जे. के. फाईल्सचे वरिष्ठ अधिकारी व संचालक उपस्थित होते. तर कामगारांचे 20 प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी कामगारांनी किमान 25 लाख रुपये मिळावेत अशी मागणी केली. परंतु कंपनीची परिस्थिती नसल्याने ही रक्कम देण्यास कंपनीच्या संचालकांनी असमर्थता व्यक्त केली.
परंतु यातून योग्य तोडगा निघाला पाहिजे, इतकी वर्ष अनेक कामगारांनी जे. के. फाईल्समध्ये सेवा बजावली आहे. त्यांना योग्य मोबदला दिला पाहिजे असे ना. सामंत यांनी स्पष्ट केले. कंपनीची सद्याची जागा कोणत्याची बांधकाम व्यावसायिकाला विकता येणार नाही असेही ना. सामंत यांनी स्पष्ट केले. कंपनीने कामगारांच्या भल्याचा विचार करावा अशा सूचना करताना आठवडा भरात यावर योग्य तोडगा काढण्यासाठी पुन्हा बैठकीचे आयोजन केले जाणार आहे.