यावर्षीच्या काजू हंगामात उत्पादनात 50 टक्क्यांची घट

रत्नागिरी:- कोकणचं ‘पांढरं सोनं’ समजल्या जाणार्‍या काजू पिकाला हवामानाची मोठी झळ बसली असून, उत्पादनात मोठी घट झाली आहे. काजूवर फुलकिडे, टीम मॉस्क्युटो रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे यावर्षी 40 ते 50 टक्के इतकेच उत्पादन आहे. यावर्षी गावठी काजूसाठी 105 तर वेंगुर्ला 4 व 5 साठी 115 रुपये दर दिला जात आहे. उत्पादन कमी असल्याने दर वाढवून मिळावा किंवा हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

ओल्या काजूगर विक्रीबरोबर वाळविलेल्या काजू बीची विक्री करून शेतकर्‍यांना उत्पन्न मिळते. गावठी काजूबरोबर कोकण कृषी विद्यापीठ प्रमाणित वेंगुर्ला 4 व 5 या वाणाची लागवड शेतकर्‍यांनी केली आहे. मात्र, सुरुवातीपासून फुलकिडे (थ्रीप्स), टीम मॉस्क्युटों रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे काजू पिकावर कीडरोग प्रतिबंधात्मक फवारणी करावी लागली. काही ठिकाणी फवारणी करूनही शेतकरी फुलकिड्यावर नियंत्रण मिळवू शकले नसल्यामुळे काजू बीच्या टरफलावर काळे डाग पडून बिया काळवंडल्या आहेत.
हवामानातील बदलामुळे यावर्षी काजूचे उत्पादन घटले असून, उत्पादन व खर्च यांचा मेळ बसत नसल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. प्रक्रिया केलेल्या काजुगरालाही मागणी नसल्याने प्रक्रिया उद्योग धोक्यात आला आहे. शासनाकडून काजूला योग्य हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकर्‍यांकडून करण्यात येत आहे. काजू बोंडावर तसेच टरफलावर प्रक्रिया करणारे उद्योग नसल्यामुळे ते मातीमोल होते. अशा प्रक्रिया व्यवसायांना चालना मिळणे आवश्यक आहे