रत्नागिरी:- मुंबई विद्यापीठाला एनआयआरएफ रँकिंगमध्ये देशातील पहिल्या पन्नास विद्यापीठाच्या यादीत स्थान मिळवलं आहे. तसेच मुंबई विद्यापीठाला नॅकमध्ये मिळाली श्रेणी ही सर्वांच्या मेहनतीचं फळ आहे, असे प्रभारी संचालक डॉ. किशोर सुखटणकर यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठाचा १६६ वा वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबई विद्यापीठाचा इतिहास आणि विद्यापीठाच्या उज्ज्वल परंपरेची माहिती त्यांनी सर्वांना सांगितली. मुंबई विद्यापीठ हे भारतातील सर्वात जुन्या तीन विद्यापीठांतील एक, मुंबई विद्यापीठाची स्थापना स्थापना १८ जुलै, १८५७ साली झाली. मुंबई विद्यापीठाची ठाणे, कल्याण, रत्नागिरी आणि नव्याने स्थापन झालेले सिंधुदुर्ग येथे उपपरिसर आहे. तसेच विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सुमारे ९०० महाविद्यालयांमध्ये तब्बल ९ लाखाहून जास्ती विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई विद्यापीठाचा विस्तार आहे. या सर्व जिल्ह्यांतील बहुतेक सार्वजनिक महाविद्यालये मुंबई विद्यापीठाच्या अधिपत्याखाली येतात. मुंबई विद्यापीठातून विविध ज्ञानशाखांत पदवीपूर्व, पदवीचे, पदविकांचे तसेच विद्यावाचस्पती आणि पदवी पश्चातचे शिक्षण दिले जाते. या जिल्ह्यातील अभियांत्रिकी आणि इतर व्यावसायिक शिक्षण देणारी बहुतेक खासगी महाविद्यालयेसुद्धा मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहेत. मुंबई विद्यापीठाचा १६६ वा वर्धापन दिन रत्नागिरी उपपरिसरामध्ये प्रभारी संचालक डॉ. किशोर सुखटणकर यांच्या शुभ हस्ते झाला. यावेळी व्यासपीठावर उपपरिसराचे प्रभारी कुलसचिव डॉ. अभिनंदन बोरगावे उपस्थित होते तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.









