Monday, June 29, 2026
spot_img
Home रत्नागिरी मुंबई-गोवा महामार्ग; नियोजनाच्या अभावामुळे कोकणवासीयांचा प्रवास अद्याप खडतर

मुंबई-गोवा महामार्ग; नियोजनाच्या अभावामुळे कोकणवासीयांचा प्रवास अद्याप खडतर

रत्नागिरी:- गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ प्रतीक्षेत असलेला मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा प्रकल्प कोकणवासीयांसाठी अजूनही एक दिवास्वप्नच ठरत आहे. राजकीय घोषणा आणि नव्या डेडलाईन्सचा पाऊस पडत असला, तरी प्रत्यक्ष जमिनीवर मात्र चुकीचे नियोजन, कामातील त्रुटी आणि पैशांचा मोठा अपव्यय झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

​खेड तालुक्यातील आवाशी-गुणदेफाटा आणि खेड रेल्वे स्थानक परिसरात कंत्राटदाराच्या आणि प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनाचा मोठा फटका बसला आहे. येथे कोट्यवधी रुपये खर्च करून नुकताच पूर्ण झालेला काँक्रिटचा रस्ता पुन्हा खोदून तिथे ओव्हरहेड ब्रिज आणि फुट ब्रिज बांधले जात आहेत. यामुळे सार्वजनिक पैशांचा सुमारे ४० कोटींचा चुराडा झाला असून, वाहनचालकांना पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

​परशुराम घाटात भर उन्हाळ्यातही उपाययोजनांची घाई सुरू आहे. दरीच्या बाजूने टाकलेला मातीचा भराव पावसाळ्यात वाहून गेल्याने, आता ३.५ कोटी रुपये खर्चून संरक्षक भिंतीचे काम पुन्हा केले जात आहे. तसेच, कशेडी बोगद्यातील पाणीगळती आणि भोस्ते घाटातील अपूर्ण रुंदीकरण प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत.

चिपळूण, लांजा, संगमेश्वर आणि पाली येथील उड्डाणपुलांची कामे अद्याप प्रगतीपथावर आहेत. आरवली ते वाकेड दरम्यानचा मार्ग अजूनही पूर्णपणे चौपदरी झालेला नाही. इंदापूर आणि माणगाव येथील बायपास रस्ते रखडल्याने वाहनांना शहरातून जावे लागत असून प्रचंड वेळ वाया जात आहे.

​या १२ वर्षांच्या विलंबात सुमारे २,५०० हून अधिक प्रवाशांना अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. महामार्गाच्या या दुरवस्थेविरोधात ‘जनआक्रोश समिती’ने लढा अधिक तीव्र केला आहे. नुकताच काढलेला ‘तिरडी मोर्चा’ आणि ठिकठिकाणी होणारे ‘रास्ता रोको’ हे प्रशासनावरील वाढत्या दबावाचे लक्षण आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिलेल्या आश्वासनानुसार, आता हा महामार्ग एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण करण्याची नवी तारीख देण्यात आली आहे. मात्र, रखडलेले उड्डाणपूल आणि तांत्रिक चुकांची दुरुस्ती पाहता, कोकणचा हा प्रवास या तारखेपर्यंत तरी खरोखर ‘सुसाट’ होणार का, हाच मोठा प्रश्न आहे.