मुंबई-गोवा महामार्गाचे काम कासवगतीने; दहापैकी सात टप्प्याचे काम अपूर्णावस्थेत 

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या दहा टप्प्यातील तीन टप्पे अंतिम टप्प्यात असून सात टप्पे अपूर्णावस्थेत आहेत. त्यात रत्नागिरी तालुक्यातील दोन टप्प्यांची कामे कासवगतीने सुरु आहेत. यामुळे महामार्गाचे काम वेळेत पूर्ण होणार की नाही यावर प्रश्नचिन्हच आहे. 

मुंबईतून कोकणात अगदी गोव्यात जाताना वाहनचालकांना अवघड घाटांसह खाचखळग्यातून अनेक वर्ष प्रवास करावा लागत होता. या महागार्माच्या चौपदरीकरणाची घोषणा केंद्राने घेतल्यानंतर 366 किमीचे दहा टप्पे करण्यात आले. यासाठी 2013 मध्ये जवळपास 11 हजार 745 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. या प्रकल्पाच्या रक्कमेत तब्बल तीन हजार कोटींची वाढ झाल्यामुळे हा प्रकल्प 15 हजार कोटींवर गेला आहे. त्यात भूसंपादनासाठी 4 हजार 700 कोटींची तरतूद होती, तर 6 हजार 100 कोटी रुपये प्रत्यक्ष कामासाठी आहेत. या महामार्गावरील उड्डान पूल, नद्यांवरील 14 पूल, कशेडी बोगदा यासाठीही वेगळी तरतूद करण्यात आली. भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. अनेक ठिकाणी काही त्रुटी राहिल्यामुळे जमीन मालकांकडून विरोध होत आहे. महामार्ग चौपदरीकरणाला 2017 ते 2018 मध्ये प्रत्यक्ष या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. त्यावेळी डिसेंबर 2019 मध्ये या महामार्गाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु ते झाले नाही. त्यानंतर कोरोनामुळे सर्वच कामे ठप्प झाली होती. त्याचाही परिणाम या महामार्गाच्या चौपदरीकरणावर झाला.

सिंधुदूर्गमध्ये जवळपास तीनही टप्पे पूर्ण होत आले असून, काही किरकोळ कामे शिल्लक राहिलेली आहेत. परंतु रत्नागिरी जिल्ह्यात कशेडी ते परशुराम हा टप्पा पूर्ण होण्याच्या स्थितीत आहे. त्यापुढे आरवलीपर्यंत 40 टक्के काम पूर्ण झाले आहे. पण आरवली ते वाकेड या दोन टप्प्यांची कामे 15 टक्केही झालेली नाहीत. याठिकाणी देण्यात आलेला ठेकेदार बदलण्यात आल्यानंतर काहीप्रमाणात आता रस्त्याच्या कामाने वेग घेतला आहे. महामार्गावर 14 पुलांची कामे असून त्यातील तेरा कामे एकाच कंपनीकडे आहेत. यातील जगबुडी व वाशिष्ठी नदीवरील एक लाईन सुरु करण्यात आली असून दुसरी लाईनचे काम प्रगतीपथावर आहे. राजापूर येथील पुलाचे कामही प्रगतीपथावर आहेत. उर्वरीत पुलांची कामे रखडली आहेत. कशेडी बोगद्यामुळे महामार्गावरील जवळपास10 ते 15 किमीचे अंतर वाचणार आहे. या बोगद्यांची कामेही पूर्णत्वाच्या टप्प्यावर आहेत. सद्यस्थितीत अर्धवट कामे व अन्य कारणांमुळे या महामार्गाची चाळण झाली असून लोकप्रतिनिधीही त्याकडे पुरेसे लक्ष देत नसल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे त्याच्या पूर्ततेकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.