मिऱ्या-पाटीलवाडी येथील बंधारा गेला वाहून 

उधाणाचा फटका, तीन ते चार माड गिळंकृत

रत्नागिरी:- समुद्राच्या रौद्ररुपाचा फटका मिर्‍या पाटीलवाडी येथील रहिवाशांना बसला. पाटीलवाडी येथे बंधाराच वाहुन गेल्याने समुद्राने रहिवाशांच्या जागेत घुसखोरी करून तीन ते चार माड गिळंकृत केले. तर लाटांच्या मार्‍याने अनेक ठिकाणाच्या भागाची मोठी धुप झाली आहे. बंधारा अनेक ठिकाणी वाहुन गेल्याने किनारी भागातील रहिवाशांना धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.  

मिर्‍या बंधार्‍याच्या सुमारे साडे तीन किमीच्या धुपप्रतिबंधक बंधार्‍याची वाताहात सुरूच आहे. किनार्‍याची धुप थांबविण्यासाठी हा बंधारा बांधण्यात आला असला तरी समुद्राच्या अजस्र लाटांमुळे बंधार्‍याची धुप गेली काही वर्षे सुरूच आहे. मात्र ती काही थांबता थांबलेली नाही. बंधार्‍यामुळे अनेक भागाचे संरक्षण झाले असले तरी मिर्‍या-पाटीलवाडीचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. अन्य भागात धुपप्रतिबंधक बंधारा आहे. मात्र पाटीलवाडी भागामध्ये काही मीटर बंधाराच शिल्लक राहिलेला नाही. बंधार्‍याची दुरूस्तीची करण्यात आलेली नाही. बंधाराच नसल्याने समुद्राच्या अजस्र लाटांनी आज पाटीलवाढीत आक्रमन करून तेथील तीन ते चार माड गिळंकृत केले. किनार्‍याची मोठ्या प्रमाणात धुप झाली असून समुद्राच्या उधाणाचे पाणी थेट घरापर्यंत येत आहे. ते आडविण्यासाठी नगरिकांनी चिर्‍याचे किंवा दगडांचे बांध घातले आहे. समुद्राच्या या आक्रारविक्राल रुपाने पाटीलवाडीतील रहिवाशांच्या मनात धडकी भरली आहे. प्रशासनाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ उपाय योजना करण्याची गरज आहे.  

मिर्‍यावासियांचे अनोखे आंदोलन दुर्लक्षित

समुद्राचे खवळलेले पाणी किनारपट्टी भागात शिरल्याने तेथील घरे आणि बगयातीला धोका निर्माण झाला आहे. आजवर अनेक आंदोलने करूनही प्रशासन इकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. लक्ष वेधून घेण्यासाठी मिर्‍या ग्रामस्थांनी अनोखे आंदोलने केले. संदीप शिरधनकर या तरुणाने बंधार्‍यावर जाऊन निषेध म्हणून स्वतःचे मुंडण करून घेतले तर आज याच तरुणाने जय श्री राम लिहिलेला दगड बंधार्‍यावर ठेऊन भगवा झेंडा फडकवला.