मिर्‍या समुद्रकिनारी फसलेले बसरा जहाज तब्बल तीन वर्षानी निघणार बाहेर

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरालगतच्या मिर्‍या-पंधरामाड समुद्रकिनारी भरकटत आलेले शारजाचे ‘बसरा’ जहाज तब्बल तीन वर्षानंतर पावसाळा सुरू होण्यापूर्वी तेथून हटवले जाणार आहे. 3 जून 2020 रोजी निसर्ग वादळात भगवती बंदरात नांगरून ठेवलेले जहाज नांगर तुटल्याने भरकटत रत्नागिरी किनार्‍यावरील खडकात येऊन अडकले होते. या जहाजाचे भंगार साहित्य काढून पूर्णपणे हटल्यानंतर तेथील टेट्रापॉडचा बंधारा टाकण्यातील अडथळाही दूर होणार आहे.

शारजाचे ऑईल टँक बसरा जहाज डिझेल घेऊन श्रीलंकेकडे जात होते. 3 जून 2020 रोजी निसर्ग वादळाचा धोका असल्याने हे जहाज आश्रयासाठी रत्नागिरी शहरातील भगवती बंदरात आले होते. नांगर टाकून हे जहाज समुद्रात उभे होते.
समुद्रातील जोरदार वारे आणि लाटांच्या मार्‍याने या जहाजाचा नांगर तुटला आणि हे जहाज भरकटत मिर्‍या-पंधरामाड समुद्रकिनारी खडकात येऊन अडकले. तब्बल 3 वर्षे हे जहाज याच ठिकाणी अडकून आहे.

पाऊस आणि समुद्री लाटांच्या तडाख्यांनी हे जहाज पूर्णपणे निकामी झाल्याने ते भंगारात काढण्यात आले. स्थानिक उद्योजकाने हा व्यवहार केला. त्या नंतर शासन स्तरावरील प्रक्रिया सुरू झाली.
शारजाचे जहाज रत्नागिरीच्या समुद्रकिनारी भरकडून अडकल्यानंतर तब्बल अडीच वर्षे शासन स्तरावर प्रक्रिया सुरू होती ती आता अंतिम टप्प्यात आली आहे. सीमा शुल्क विभागाचे वस्तू व सेवाकर भरल्यानंतर हे जहाज तेथून हटवण्यास परवानगी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तब्बल तीन वर्षानंतर समुद्रकिनारी हेलकावे खात अडकून पडलेले बसरा जहाज पावसाळा सुरू होण्यापूर्वी तेथून पूर्णपणे काढले जाणार आहे.

मिर्‍या पंधरा माड भागात अडकून पडलेल्या या जहाजामुळे तेथील धूपप्रतिबंधक बंधार्‍याच्या कामात अडथळे येत होते. येथील 15 ते 20 मीटर लांबीच्या बंधारर्‍याचे काम सोडून पुढील काम करावे लागत होते. त्यामुळे आता लवकरच जहाजाच्या ठिकाणी रखडलेला बंधाराही पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला