बंधाऱ्याचे 40 टक्के काम पूर्ण
रत्नागिरी:- मिर्या किनार्यावरील लोकवस्तीच्या सुरक्षेसाठी उभारण्यात येणार्या ग्रोयन पद्धतीच्या बंधार्याचे सुमारे 40 टक्के काम पूर्ण झाले आहे. पावसाळ्यामध्ये लाटांचा तडाखा बसून पाणी गावात शिरू नये यासाठी किनार्यावर दगड आणि टेट्रापॉडस् भिंत उभारली आहे. समुद्राच्या लाटांचा वेग कमी करण्यासाठी समुद्रात उभारण्यात येणार्या सातपैकी चार ग्रोयनचे काम वेगाने सुरू आहे. याला पणन मंडळाच्या अधिकार्यांनीही दुजोरा दिला.
पावसाळ्यात समुद्राला येणार्या उधाणाच्या लाटांचा तडाखा किनार्यावरील मिर्या ग्रामस्थांना बसत आहे. पांढऱ्या समुद्रापासून ते मिर्यापर्यंत सुमारे पावणेदोन किलोमीटर अंतराच्या किनार्यावरील लोकं दरवर्षी पावसाळ्यात भितीच्या छायेखाली राहतात. येथील लोकांच्या सुरक्षेसाठी अनेकवेळा आवाज उठवण्यात आला होता. पालकमंत्री उदय सामंत यांनीही या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना व्हाव्यात म्हणून शासनदरबारी पाठपुरावा केला. त्यानंतर दीडशे कोटी रुपयांचा ग्रोयन पद्धतीचा बंधारा उभारण्याला मंजुरी मिळाली. त्याचे भूमिपूजन झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला थोड्या उशिराने सुरवात झाली. गेल्या सहा महिन्यामध्ये कामाचा वेग वाढला आहे. नव्या पद्धतीमध्ये किनार्यावर हजार टनाहून अधिक वजनाचे मोठे दगड लावण्यात आले आहेत. त्यानंतर लाटा आपटण्यासाठी भलेमोठे टेट्रापॉडस् टाकण्यात आले आहेत. त्यामुळे लाटांपासून हा किनारा सुरक्षित होईल, असा दावा केला जात आहे.
किनार्यापासून समुद्रात सुमारे दोनशे मीटर अंतरापर्यंत ग्रोयन म्हणजेच टेट्रापॉडसची शंभर मीटर जाडीची भिंत टाकली जात आहे. येथे सात ग्रोयन उभारण्यात येणार आहेत. दोन ग्रोयनमधील अंतर सुमारे दोनशे ते तीनशे मीटर असेल. आतापर्यंत चार ग्रोयनचे काम युद्धपातळीवर सुरू असून तीनचे काम जवळपास पूर्ण झालेले आहेत. याला लागणारे सिमेंटचे टेट्रापॉडस् एमआयडीसीमध्ये बनवले जात आहेत. तेथून लॉरीमधून वाहून मिर्या गावात आणले जात आहेत. सध्या या ठिकाणी तीन ते चार क्रेन, डंपर, पोकलेन ठेवण्यात आले आहेत. मिर्या येथील बंधार्याचे काम पूर्ण झाले की, पर्यटनाला चालना देण्यासाठी मरिन ड्राईव्हच्या धर्तीवर रस्ता बनवण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाकडून 41 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. बंधार्याला लागून सुमारे 40 फुटी रस्ता बांधला जाणार असल्याचे पतन विभागाकडून सांगण्यात आले.