रत्नागिरी:- तालुक्यातील जयगड येथील एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. मासेमारीसाठी गेलेली नविद-२ ही नौका आणि त्यावरील तांडेलसह पाच खलाशी बेपत्ता झाले आहेत. गेली पाच दिवस त्यांच्याशी कोणताही संपर्क न झाल्याने मालकाने जयगड पोलिस ठाण्यात, तशी तक्रार दाखल केली आहे. स्थानिक मच्छीमारांनी शोध मोहिम सुरू केली असून कोणाला काही माहिती मिळाल्यास जयगड पोलिसांशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
जयगड येथील नासीर हुसैन मिया संसारे यांच्या मालकीची ही मासेमारी नौका आहे. “नविद २” असे तिचे नाव असून २६ ऑक्टोबरला ही नौका मासेमारीसाठी जयगडहुन निघाली. बहुदा दोन ते तीन दिवसांमध्ये मासेमारी करून नौका परत येते. परंतु यावेळी ती परत आलीच नाही किंवा तांडेल, अन्य खलाशांचा संपर्कच झाला नाही. श्री. संसारे यांनी संपर्क करण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. तसेच सोशल मीडियावर त्याची माहिती आणि फोटो देखील व्हायरल केले. मात्र अजून काही संपर्क झालेला नाही. या बोटीवर तांडेल दगडू गोविंद नाटेकर, गोकुळ तुकाराम नाटेकर, अनिल गोविंद आंबेकर, सुरेश धाकू कांबळे (सर्व, रा. गुहागर) तालुक्यातील साखरीआगर गावाचे रहिवासी असून दत्तात्रय सुरेश झगडे (रा. अडूर) व अमोल गोविंद जाधव (रा. मासू) येथील आहेत. ते अजून परत आलेले नाहीत. तरी सदर बोटी बद्दल किंवा व्यक्तींबद्दल काही माहिती मिळाल्यास जयगड पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
नौका बेपत्ता झाल्याने जयगड आणि साखरीआगर परिसरातील वातावरण अतिशय गंभीर आहे. बेपत्तांच्या शोध घेण्यासाठी काही स्थानिक मच्छीमार देखील बाहेर पडले आहेत. आजचा पाचवा दिवस त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. कोणालाही कोणतीही माहिती उपलब्ध न झाल्याने चिंता वाढली आहे.