रत्नागिरी:- बेदरकारपणे दुचाकी चालवून ती टोईंग व्हॅनवर आदळल्यामुळे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकी चालक तरुणाला अधिक उपचारांसाठी कोल्हापूरला नेण्यात आले आहे. तर त्याच्या पाठीमागे बसलेल्या मित्रावर जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.अपघाताची ही घटना रविवार 22 फेब्रुवारी रोजी रात्री 11.45 वा.सुमारास महिंद्रा शोरुमच्या समोर घडली होती.
ओमसाई अजय मकवाना (18 ,रा.कोकणनगर, रत्नागिरी) गंभीर जखमी झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. रविवार 22 फेब्रुवारी रोजी रात्री 11.45 वा.सुमारास ओमसाई त्याच्या ताब्यातील दुचाकी (एमएच-10-डीएच-7906) वर पाठीमागे त्याचा मित्र हर्षित सुभाष मांजरेकर (17, रा.शिवाजीनगर, रत्नागिरी) याला बसवून कोकणनगर ते जयस्तंभ असे जात होते. ते मारुती मंदिर नजीक महिंद्रा शोरुम समोर आले असता त्यावेळी एक टोईंगव्हॅन थार गाडी लोड करुन शोरुमच्या गेटमधून आत जात असताना या भरधाव दुचाकीची त्या टोईंगव्हॅनला धडक बसून हा अपघात झाला. या अपघातात ओमसाई मकवानाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तो जागीच बेशूध्द पडला तर त्याचा मित्र हर्षितच्या पायांना दुखापत झाली. दोघांनाही तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू ओमसाई शुध्दीवर येत नसल्याने त्याला अधिक उपचारांसाठी कोल्हापूरला नेण्यात आले आहे. या अपघाताची नोंद जिल्हा शासकिय रुग्णालयातील पोलिस चौकित करण्यात आली आहे.









