‘माझ्या मृत्यूला कुणाला जबाबदार धरू नका’… भाट्ये पुलावरून उडी मारत वकिलाची आत्महत्या

रत्नागिरी:- माझ्या मृत्यूला फक्त मी जबाबदार आहे… माझी शेवटची इच्छा म्हणून, कृपया माझ्या मित्रांची, माझ्या नातेवाईकांची, माझ्या रूम मेट ची, मी रहात असलेल्या मालकांची अथवा अन्य कोणाचीही कोणतीही चौकशी करू नका असा स्टेटस ठेवत भाटये पुलावरून उडी मारून रत्नागिरीतील वकिलाने आत्महत्या केल्याचा दुर्दैवी प्रकार उघडकीस आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऍड सौरभ सोहनी असे आत्महत्या केलेल्या वकीलाचे नाव आहे. ऍड. सौरभ सोहनी हे मूळचे राजापूर तालुक्यातील रहिवासी असून ते रत्नागिरीत वकिली करीत होते. आपल्या मित्रा सोबत ते भाड्याने राहात होते.

मित्राची गाडी घेऊन जेवायला जातो असे सांगून ते रुममधून बाहेर पडले. आणि थेट भाटये ब्रिज गाठला. भाटये पुलावर आल्यानंतर आपल्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नका अशा आशयाचे स्टेटस ठेवून त्यांनी समुद्रात उडी मारली.

त्यांचे स्टेटस पाहून काही वकिलांनी पोलिसांशी संपर्क केला. त्यानंतर वकील आणि पोलीस त्यांच्या शोधात बाहेर पडले. रात्रीची वेळ आणि त्यातच मुसळधार पाऊस यामुळे त्यांच्या शोधकार्यात अडचणी आल्या. मंगळवारी सकाळी ऍड. सौरभ सोहनी यांचा मृतदेह खडपेवठार समुद्र किनारी तरंगताना आढळून आला.
याची नोंद शहर पोलीस स्थानकात करण्यात आली असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.