प्रमोद जठार; स्थानिकांना मिळणार रोजगार
रत्नागिरी:- जिल्ह्यात आगामी काळात मोठे प्रकल्प येऊ घातले आहे. या प्रकल्पांना आवश्यक असलेल्या स्किलचे स्थानिक उमेदवार मिळावे, यासाठी भुवणेश्वर ट्रेनिंग सेंटरच्या धर्तीवर रत्नागिरी आयटीआयच्या ३० एकर जागेवर तसे ट्रेनिंग सेंटर उभारण्याचा प्रयत्न आहे. त्याचा संबंधित मंत्र्यांशी चर्चा करून सविस्तर प्रकल्प अहवला तयार करण्याच्या सूचना आयटीआयच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे, अशी माहिती भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री. जठार म्हणाले, आयटीआयला आज भेट देऊन तेथील आढावा घेतला. जिल्ह्यात ग्रीन रिफायनरी, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प होऊ घातले आहेत. या प्रकल्पांना त्या-त्या विभागातील कौशल्य असणारे कामगार लागणार आहेत. राज्यातील भुवनेश्वर हे सर्वांत मोठे स्किल ट्रेनिंग सेंटर आहे. त्या धर्तीवर रत्नागिरीतील आयटीआयच्या ३० एकर जागेवर मोठे ट्रेनिंग सेंटर उभारण्याचा प्रयत्न आहे. या ट्रेनिंग सेंटरला तालुका-तालुक्यातील आयटीआय संलग्न करण्यात येतील. मुलांना दर्जेदार कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळाल्यास जिल्ह्यातील रोजगाराचा प्रश्न सुटेल. त्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्याशीही चर्चा झाली आहे. संबंधित मंत्र्यांबरोबरही चर्चा झाली आहे. ते सकारात्मक असल्याने या प्रकल्पाबाबत आयटीआयच्या अधिकाऱ्यांना सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.