भाट्ये समुद्रकिनारी थार गाडी वाळूत रुतली; चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील भाट्येकिनारी थारगाडी चालवून मज्जामस्ती करताना गाडी वाळून रुतली. यातून मित्रांच्या जिवीतास धोका निर्माण केल्या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुषण गजानन भेलेकर (वय २०, रा. मालेगाव, जि. नाशिक) असे संशयित चालकाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. ९) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भाटे समुद्रकिनारी घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे भाट्ये चेकपोस्ट येथे कर्तव्य बजावत असताना स्थानिक नागरिकांनी एक काळ्या रंगाची चारचाकी थार गाडी (क्र. एमएच-०४ सीएक्स ८२६२) भाट्ये समुद्र किनारी फेऱ्या मारीत असल्याचे कळविले. माहिती मिळताच फिर्यादी संग्राम झांबरे व पोलिस कॉन्स्टेबल पाटील हे घटनास्थळी गेले. त्यावेळी थार गाडी वाळुमध्ये व पाण्यामध्ये चालविली त्यामुळी ती वाळूमध्ये रुतुन त्यांचे तसेच गाडीतील मित्रांच्या जीवितास धोका निर्माण होईल हे माहिती असताना गाडी निष्काळजीपणे चालविली. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल संग्राम झांबरे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी निष्काळजीपणे वाहन चालविणाऱ्या संशयित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.