भाजपची राज्यात सत्ता येताच शिवसैनिकांचा छळवाद: आ. भास्कर जाधव

रत्नागिरी:- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष वाढवण्यात मोठा वाटा आहे. मात्र केंद्रात व राज्यात सत्ता येताच त्यांनी शिवसैनिकांचा छळवाद मांडला आहे. जनता उघड्या डोळ्यांनी हे बघत आहे. त्यामुळे या अत्याचाराला, अन्यायाला, सत्तेच्या बाजाराला शंभर टक्के जनता उत्तर देईल असा विश्वास उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी व्यक्त केला.

आमदार राजन साळवी यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केलेला गुन्हा व सुरु असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर उबाठाचे नेते आ. भास्कर जाधव, त्यांचे चिरंजीव व माजी जि.प. अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी आ. साळवींच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी आ. साळवींना आलिंगन देत, आपण साळवी कुटुंबाबरोबर असल्याचे आश्वस्त केले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आ. जाधव म्हणाले की, भारतीय जनता पार्टीबरोबर जे गेले नाहीत, त्यांच्यावर आता कारवाया होत आहेत. आमच्या आयुष्यातील मागील 25 ते 30 वर्ष शिवसैनिक व पदाधिकार्‍यांनी काँग्रेस सरकार उलथून टाकण्यासाठी रक्ताचे पाणी केले. मात्र आता या गोष्टीचा पश्चाताप होत आहे, काँग्रेस राजवटीत कोणत्याही विरोधी पक्षातील छोट्याछोट्या माणसांना त्रास दिला जात नव्हता. तो त्रास ज्या भारतीय जनता पार्टीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रात वाढवले, त्याच भाजप सरकारने केंद्रात व राज्यात आल्यानंतर शिवसैनिकांना म्हणजे आ. राजन साळवी असोत की आ. वैभव नाईक, अकोल्याचे आमदार नितीन देशमुख, खा. संजय राऊत, आ. रविंद्र वायकर, किशोर पेडणेकर, सुरज चव्हाण अशा अनेकांचा छळवाद मांडला आहे. हे बघून आता असे वाटते की याच साठी का शिवसैनिकांनी भाजपाला महाराष्ट्रात वाढवले आहे. या गोष्टीचे आम्हाला दु:ख होत असल्याचे आ. भास्कर जाधव यांनी सांगितले.

सद्या सुरु असलेल्या अत्याचाराला, अन्यायाला, सत्तेच्या बाजाराला शंभर टक्के जनता उत्तर देईल असा विश्वास आ. भास्कर जाधव यांनी व्यक्त केला. सगळ्या घटना जनता उघड्या डोळ्यांनी बघत आहे. आ. राजन साळवी हे काय फक्त राजकारणामुळे मोठे झाले का, त्यांनी कोणता कामधंदा, व्यवसाय केला नाही काय असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. व्यवसायातून त्यांनी चार पैसे उभे करु नयेत का? असेही ते म्हणाले की कोणत्या नियमात, कायद्यात असे लिहीले आहे का की स्वत:च्या कुटुंबासाठी उद्योग, व्यवसायातून अर्थार्जन करु नये, जनता या अत्याचारांना योग्य उत्तर देईल असेही ते म्हणाले. प्रत्येक गोष्टीला उत्तर काळ असतो, आमच्यावर सुरु असलेला छळवाद आता जनतेलाही अहसय्य झालेला आहे. त्यामुळे त्याचे उत्तर व त्याचा हिशोब जनता करेल त्यात आम्ही समाधानी असू असेही आ. जाधव यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे आता सत्तेत गेलेले 9 आमदार यांच्या एसीबी, ईडी, इनकमटॅक्सच्या चौकश्या नव्हत्या का? चाळीस आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेले त्यांच्या चौकश्या नव्हता. मग हे सर्व तिकडे गेले, त्यानंतर काय झाले. रक्षाबंधन झाले का असा प्रश्ही त्यांनी उपस्थित केला. या घटना फक्त महाराष्ट्रापुरत्याच मर्यादीत नसून, झारखंड, पश्चिम बंगाल, दिल्ली या ठिकाणीही असेच सुरु आहे.
प्रभू रामचंद्र सवांर्ंंचा आहे. त्यामुळे 22 तारखेला प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापा होणार आहे. हा उत्सव सर्वांनी मोठ्या धुमधडाक्यात साजरा करावा असे आवाहनही त्यांनी केले. हे मंदिर व्हावे ही कुणा एका पक्षाची इच्छा नव्हती. किंबहूना जो पक्ष त्या घटनेची जबाबदारीच घ्यायला तयार नव्हता, त्यावेळी हिंद्ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ती जबाबदारी घेतली होती. त्यावेळी असणारे विहींप, बजरंग दलाचे नेते असोत की अशोक सिंघलांचे अनुयायी, प्रवीण तोगडीया, साध्वी ऋतुंबरा, उमा भारती असोत की लालकृष्ण आडवाणी हे सगळे आहेत कुठे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शिवसेनेचे बलिदान जे नाकारतायत, त्याच गोष्टीमुळे लालकृष्ण अडवानींना पंतप्रधान होता आले नाही असे आ. जाधव यांनी सांगितले. ज्यांना हे राजकारणासाठी करायचे आहे, त्यांना आता जनतेने उत्तर द्यायला हवे असही आ. जाधव म्हणाले.


प्रभू राम सर्वांचेच, कुणा एकाचे नाहीत:आ. जाधव
प्रभू राम हे सर्वांचे आहे, तो कुणा एकाचे नाही. ज्यांना राम राजकारणाकरीता वापरायचा आहे त्यांना तो राजकारणासाठी वापरता येणार नाही. राम आमची श्रध्दा आहे. राम आमची भक्ती आहे, राम आमचे स्वप्न आहे. त्यामुळे सर्वांनी हा प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या आनंदाने साजरा करावा असे आवाहनही आ. भास्कर जाधव यांनी केले.