भागोजीशेठ कीर यांचे स्मारक कष्ट अन् प्रामाणिकपणाचे प्रतीक


ना. उदय सामंत यांचे श्रीमान भागोजीशेठ कीर स्मारक लोकार्पण सोहळ्यात प्रतिपादन

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथील दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर स्मारक प्रत्येकासाठी अपार कष्ट, प्रामाणिकपणा आणि सुसंस्काराचे प्रतिक ठरेल. भंडारी समाजानेच नव्हे तर सर्व समाजांनी दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर यांचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी केले.

साळवी स्टॉप येथे दानशूर भागोजीशेठ कीर यांचे स्मारक व्हावे, यासाठी भंडारी समाजाचे नेते तथा शिवसेनेचे नगरसेवक राजीव कीर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानुसार पालकमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत या स्मारकासाठी 40 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या संदर्भातील उल्लेख करताना पालकमंत्र्यांनी उल्लेख केला. ते म्हणाले की, गेल्या 70-80 वर्षांपासून या स्मारकाची मागणी होत होती ती पूर्ण करण्याचे भाग्य आपल्याला मिळाल्याचे समाधान होत आहे. स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी बोलताना पालकमंत्री उदय सामंत यांनी श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या अपार कष्ट, प्रामाणिक, संस्कारीत आणि दानशूर वृत्तीची माहिती दिली.

या स्मारकामुळे त्यांचे हे सद्गुन प्रत्येक पिढीला प्रोत्साहित करणारे ठरतील, असा विश्वासही व्यक्त केला. स्व.भागोजीशेठ कीर यांचा ज्या शहरात जन्म झाला त्याच रत्नागिरी शहराच्या प्रवेशद्वारावरच त्यांचे स्मारक उभारणी करण्याचे भाग्य लाभल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी श्री भैरी देवस्थानचे अध्यक्ष मुन्ना सुर्वे, सर्व नगरसेवक, नगरसेविका, शिवसेना-भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.