शाश्वत मच्छीमार हक्क संघ; स्थानिक ट्रॉलरना जेटीवर नाही जागा
रत्नागिरी:- जिल्ह्यात १ सप्टेंबरपासून पर्ससीन मासेमारी सुरू होत आहे. परवानाधारक आणि बेकायदेशीर पर्ससिन नौकांची तसेच पर्ससीन नौकांवार बेकायदेशीर बूम (हायड्रोलिक विंच) बसवून करण्यात येणारी बेकायदेशीर मासेमारी नौकांची माहिती द्यावी, अशी मागणी रत्नागिरी तालुका शाश्वत मच्छीमार हक्क संघाने निवेदनाद्वारे सहाय्यक मत्स्य आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
ज्या नौकांचा ट्रॉलिंगचा परवाना असताना त्यावर पर्ससीन सामुग्री बसवून मासेमारी केली जात आहे. तसेच मिनी पर्ससीन (रिंगसिंग) या नौकांवर शासकीय नियमानुसार बंदी घालून कोणत्या स्वरूपाची कारवाई करणार, याची सविस्तर माहिती द्यावी. ज्या पर्ससीन नौकाचा पर्ससीन परवाना संपला आहे. तरी अशा बेकायदेशीर शेकडो पर्ससीन नौका मासेमारीसाठी तयार आहेत. तसेच ज्या नौकांचा ट्रॉलिंग परवाना आहे; पण अशा नौकांवर बेकायदेशीर पर्ससीन सामुग्री, पर्ससीन जाळी, बूम (हायड्रोलिक विंच) व्हीआरसीवर कामगार (खलाशी) ची नोंदणी केलेली असते त्या नोंदीपेक्षा जास्त कामगार (खलाशी) असतात, अशा नौकांवर कारवाई करण्यात यावी,अशी संघटनेची मागणी आहे.
जिल्ह्यातील मिरकरवाडा बंदरजेटी येथे बाहेरून येणाऱ्या नौकांवरती तातडीने कारवाई करण्यात यावी. बाहेरून येणाऱ्या नौकांमुळे रत्नागिरीतील स्थानिक मच्छीमारांच्या मच्छीला योग्य दर मिळत नाही. त्यामुळे स्थानिक नौकामालकांचे बाहेरून येणाऱ्या नौकांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याचा गांभीर्याने विचार करण्यात यावा. सागरी सुरक्षा रक्षक अशा बाहेरून येणाऱ्या नौकांना सहकार्य करतात. त्यामुळे असे प्रकार वाढले असून त्याला आळा घालण्यासाठी त्या नौकांचा नंबर, नाव, फोटो जाहीर करावा. बेकायदेशीर नौका, रत्नागिरी (मिरकरवाडा, साखरीनाटे, कासारवेली, जयगड) या बंदरात नांगरून ठेवलेल्या आहेत. तरी अशा नौकांवर कायदेशीर कारवाई करावी. मिरकरवाडा बंदरात जेटी क्र. ४ वर बेकायदेशीर पर्ससीन नौका, काही लोखंडी पर्ससीन नौका, मिनी पर्ससीन लावलेल्या असतात. त्यामुळे रत्नागिरी स्थानिक ट्रॉलिंगच्या नौकामालकांना आपल्यासाठी जेटीवर जागा मिळत नाही. सर्व स्थानिक ट्रॉलिंग नौकामालकांना एक जेटी उपलब्ध करून मिळावी,अशा मागण्या केल्या आहेत.
१ सप्टेंबरपासून मिरकरवाडा बंदरावरही सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात यावे. कारण, चालू होणाऱ्या कायदेशीर व बेकायदेशीर पर्ससीन नेट नौकावरती क्षमतेपेक्षा जास्त कामगार (खलाशी) असतात. त्यामुळे सागरी सुरक्षा धोक्यात येऊ शकते. त्याचप्रमाणे अशा नौकांमुळे देशाला अतिरेकीपासूनसुद्धा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करावा व आम्हाला सर्व सविस्तर माहिती मिळावी, असे मच्छीमार संघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सागरी सुरक्षारक्षकांचे दुर्लक्ष
रत्नागिरी व जयगड या दोन्ही परवाना अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जेवढे सागरी सुरक्षारक्षक नेमले आहेत. परंतु त्यांच्याकडुन कामात दुर्लक्ष होत आहे. त्या सर्व सागरी सुरक्षारक्षकांची नावे व मोबाईल क्रमांक मिळावेत. या कार्यक्षेत्रातील कोणते सुरक्षारक्षक कोणत्या बंदरावर नियुक्ती केले आहेत, त्यांची ड्युटी किती असते, त्यांना ड्रेसकोड आहे का? याची माहिती मिळावी, असे संघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.