बेकायदेशीर जमाव प्रकरणी ४०० जणांवर गुन्हा, महिलांचाही समावेश

असगणी सरपंच, माजी सरपंचांसह अनेकांवर अटकेची टांगती तलवार

खेड:- खेड तालुक्यात असगणी येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मनाई आदेशाचा भंग करून बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी सुमारे ४०० पुरुष आणि महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असगणी ग्रामपंचायत कार्यालय ते हिंदुस्थान कोका-कोला ब्रेव्हरेज प्रा. लि. या कंपनीच्या बाहेरील रस्त्यावर गुरुवारी, ५ जून रोजी सकाळी ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

खेड पोलीस ठाण्याअंतर्गत लोटे पोलीस दूरक्षेत्रात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल विनायक भिकू येलकर (पोकॉ/९८) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, २७ मे रोजी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाकडून अप्पर जिल्हा दंडाधिकारी रत्नागिरी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७(१)(३) अन्वये मनाई आदेश जारी केला होता. तसेच, पोलीस निरीक्षक खेड यांच्या कार्यालयातून ४ जून २०२५ रोजी भारतीय न्याय सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६८ प्रमाणे बजावलेल्या नोटीसचाही या जमावाने भंग केला.

याप्रकरणी पोलिसांनी २२ जणांवर नावानिशी आणि इतर अंदाजे ४०० पुरुष व महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये असगणीच्या सरपंच संजना संजय बुरटे, उपसरपंच यासीन फारिक घारे, सदस्य प्रमोद पांडुरंग चांदिवडे, चंद्रकांत राजाराम गोसावी, सुविंद्र रामचंद्र धाडवे, कौल मम्मील शाहीन, मेघना भाऊ नायक, चेतन चंद्रकांत पवार यांचा समावेश आहे.

याव्यतिरिक्त, माजी उपसरपंच संजय सखाराम बुरटे, माजी सरपंच अनंत विठ्ठल नायक, शिवसेना (शिंदे गट) शाखाप्रमुख इस्माईल हसन कादरी, विठ्ठल वासुदेव नायक, जावेद जब्बार आंबेडकर, रवींद्र सखाराम बुरटे, माजी सरपंच रविना रवींद्र बाईत, श्रीकांत आत्माराम फडकळे, आययूएफ संघटना सदस्य संजय आंब्रे, समिती अध्यक्ष उस्मान हसन ड्रागडे, रवींद्र विठ्ठल नायकर (माजी सरपंच) आणि संजय तुळशीराम मोहिते यांचाही आरोपींमध्ये समावेश आहे.

या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात ५ जून रोजी सायंकाळी ७.३८ वाजता गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. खेड पोलीस अधिक तपास करत आहेत.