राजापूर:- नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द झाल्यानंतर शासन-प्रशासनाने आपली पावले बारसूकडे वळवली. नाणार विरोधाचा अनुभव प्रशासनाच्या पाठीशी असल्याने आता स्थानिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न शासन-प्रशासन करत आहे. म्हणूनच जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांनी सहकार्य द्यावे, सर्वेक्षण प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये अशी अपेक्षा व्यक्त केली. बारसू येथील ग्रामस्थ नव्याने कशाप्रकारे प्रकारे विरोध करतात की सहकार्य करतात, यावर बारसू प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून आहे.
रिफायनरी प्रकल्प हा राष्ट्रीय प्रकल्प आहे. प्रर्यावरण, शेती, बागायती, आरोग्य याबाबतचे सर्व नियम, निकष पाळूनच शासन या प्रकल्पाबाबत निर्णय घेईल. त्यामुळे या प्रकल्पाबाबत स्थानिक शेतकऱ्यांच्या ग्रामस्थांच्या काही शंका असल्यास त्यांनी प्रशासनाशी चर्चा करावी, त्यांचे निरसन करण्यासाठी प्रशासन सक्षम आहे. मात्र कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न कोणी केल्यास प्रशासनाला कठोर कारवाई करावी लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिला. तसेच स्थानिकांना विश्वासात घेऊनच सर्वेक्षणाचे काम केले जाईल, त्याला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
राजापूूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प नाणार येथून रद्द झाल्यानंतर आता बारसू, सोलगाव परिसरात हा प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याकरीता माती परिक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र यापूर्वी सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना स्थानिकांनी विरोध दर्शवत सर्वेक्षणाचे काम बंद पाडले होते. त्यानंतर आता पुुन्हा सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी सायंकाळी राजापूूर नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहामध्ये जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री गायकवाड,
राजापूूरच्या प्रांताधिकारी वैशाली माने, तहसीलदार शितल जाधव, पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, नाटेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासो पाटील यांच्यासह एमआयडीसीचे अधिकारी वंदना खरमाळे उपस्थित होते. या बैठकीला समर्थक आणि विरोधक उपस्थित होते. समर्थकांच्या वतीने रविकांत रूमडे, महादेव गोठणकर, सुरज पेडणेकर, इरफान चौगुले, रमेश मांजरेकर, श्री.कदम यांनी तालुक्याचा विकास, रोजगार, आरोग्य, शिक्षण अशा सुविधांसाठी रिफायनरी प्रकल्पाची आवश्यकता असल्याचे सांगितले. आमचा विकासाला विरोध नाही, मात्र अशा रासायनिक प्रकल्पांना आमचा विरोध राहील, असे रिफायरी विरोधी समितीचे अमोल बोळे, दिप्रक जोशी यांनी सांगितले. तसेच सर्वेक्षण करण्यापूर्वी स्थानिकांना विश्वासात घेण्याची मागणी त्यांनी केली.