बारसुतील आठ हजार एकर जागेची संमतीपत्रे रिफायनरीसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे सुपूर्द

रत्नागिरी:- बारसू-धोपेश्‍वर पाठोपाठ नाणार परिसरातील विल्ये, तारळ, सागवे, गोठीवरेच्या ग्रामस्थांनी आठ हजार एकर जागा रिफायनरी प्रकल्पासाठी देण्याची तयारी दर्शविली आहे. त्या जागेच्या सातबारासह संमती पत्र मंगळवारी (ता. 14) जिल्हाधिकार्‍यांकडे सुपूर्द केले. बारसू बरोबरच या जागेचाही विचार करुन पेट्रोकेमिकल हब उभारा, अशी मागणी करत ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांनी भेट द्यावी अशी विनंतीही केली.

विल्ये दशक्रोशी रत्नागिरी रफायनरी समर्थक संघटनेच्या पदाधिकार्‍यांसह ग्रामस्थांनी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांची भेट घेतली. यावेळी अविनाश महाजन, राजा काजवे, फारुख साखरकर, केशव भट, सुहास तावडे, प्रल्हाद तावडे, माजी जि.प. सदस्या लक्ष्मी शिवलकर, सुहास मराठे, निलेश पाटणकर, अजिम चौगुले यांच्यासह मोठ्या संख्येने समर्थक ग्रामस्थ उपस्थित होते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बारसू प्रमाणेच विल्ये व दशक्रोशीतील जागेबाबत विचार करावा अशी मागणी करण्यात आली.

नाणार परिसरातील ग्रामस्थांचा रिफायनरीला होणारा विरोध लक्षात घेऊन नवीन विल्ये दशक्रोशी परिसराचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या नवीन प्रस्तावाप्रमाणे एकाही ग्रामस्थाला विस्थापित व्हावे लागणार नाही. यातून वाड्या, मंदिरे, विरोध करणारी दत्तवाडी, नाणार पाळेकरवाडी वगळून हा प्रस्ताव तयार आहे. या जागेत 19 टक्के लागवडक्षम जमीन, 10 टक्के जंगली झुडपे तर 71 टक्के मोकळी जागा आहे. त्यातील मोकळ्या जागेचा बहुतांश भाग कातळाचा आहे. जवळच विजयदुर्ग हे नैसर्गिकरित्या 19 मीटर खोलीचे बारमाही बंदरही आहे. त्याचा उपयोग प्रकल्पासाठी होईल असे निवेदनात नमूद केले आहे.

नाणार येथे 60 एमएमटीपीचा प्रकल्प होणार होता. मात्र बारसू येथे 20 एमएमटीपीचा प्रकल्प नियोजित आहे. विल्ये दशक्रोशीतील जागा शासनाने घेतल्यास पहिल्याप्रमाणेच 60 एमएमटीपीचा प्रकल्प होऊ शकतो. या ठिकाणी पेट्रोकेमिकल हबसाठीही जागा उपलब्ध होईल. त्यामुळे मुख्यमंत्री व राज्य शासनाने याचा विचार  करावा अशी मागणीही विल्ये दशक्रोशी रत्नागिरी रिफायनरी समर्थक संघटनेने केली आहे. कोरोनानंतर अनेकांचा रोजगार हिरावला गेला आहे. जिल्ह्यात रिफायनरी झाल्यास रत्नागिरी-सिंधुदूर्गतील तरुणांना फायदा होईल, असे निवेदनात नमुद केेले आहे.