बचतगटांसाठीच्या साडेतीन कोटी निधीची अद्याप प्रतिक्षाच 

भांडवल न मिळाल्याने बचतगटांच्या उत्पादनांवर परिणाम  

रत्नागिरी:- कोरोनाचे दुरगामी परिणाम नव्याने स्थापन झालेल्या महिला बचत गटांच्या उपजिवीका साखळीवर झाला आहे. कोरोनामुळे शासनाकडून वेळेत निधी दिला नव्हता. रत्नागिरी जिल्ह्याला सात कोटीची गरज असताना चार कोटी रुपये प्राप्त झाले असून साडेतीन कोटीची प्रतिक्षा आहे. हा निधी वेळेत मिळाला नाही, तर बचत गट चळवळीला फटका बसणार आहे. गटांचा कारभार सुरु करण्यासाठीचे खेळते भांडवल योग्य वेळेत न दिल्याने पुढील जीवनचक्र थांबणार आहे.

उमेद अभियानांतर्गत गावागावातील बेरोजगार महिलांना एकत्र करुन बचतीसह घरबसल्या रोजगाराची सवय लावण्यात आली. महिला बचत गट चळवळ गेल्या काही वर्षात चांगलीच फोवली असून विविध व्यावसायांच्या माध्यमातून महिला सक्षम होत आहे. अनेकांनी याच चळवळीमधून राजकारणातही पाऊल ठेवले. शेतामध्ये राबणारे हेच हात यशस्वी नियोजन करत असून घरखर्चात पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. शिक्षण, आरोग्य यासह विविध छोट्या-मोठ्या गरजाही भागवण्याची क्षमता निर्माण झाली आहे. महिलांना उमेदने चांगली संधी दिली आहे; मात्र गेल्या वर्षभरात कोरोनातील आपत्तीने नव्या बचत गटातील महिलांच्या उत्साहावर पाणी फेरले आहे.

जिल्ह्यात नव्याने स्थापन केलेल्या बचत गटांना 15 हजार रुपये खेळते भांडवले दिले जाते. त्यापोटी जिल्ह्याला 7 कोटी 50 लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यातील चार कोटी रुपये मार्च 2021 प्राप्त झाले. काही बचत गटांना त्याचे वितरण करण्यात आले; परंतु अजुनही 3 कोटी 50 रुपयांची गरज असून हा निधी येईपर्यंत गटातील महिलांना प्रतिक्षा करावी लागणार आहे. कोरोनातील परिस्थितीमुळे शासनाकडून आरोग्यकडे लक्ष केंद्रीत केले आहे. उर्वरित विभागांचा निधी अन्यत्र वळवण्यात आला आहे.