रत्नागिरी:- कायद्याच्या धाकाने नाही तर सर्वांशी प्रेमाने वागल्यानेच पोलिसांची प्रतिमा अधिक चांगली होईल, असे मत राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दिक्षित यांनी व्यक्त केले.
रत्नागिरीत एका खासगी कार्यक्रमासाठी आलेल्या श्री. दिक्षित यांनी पत्रकारांशी गप्पा मारल्या. राज्यातील पोलीस दलातील कर्मचार्यांच्या संख्येविषयी बोलताना ते म्हणाले की नुसती पोलिसांच संख्या जास्त असून गुन्हेगारी कमी होत नसते. त्या भागातील लोकांचे चारित्र्य कसे आहे यावर अवलंबून असते. लोकांची वृत्ती सामंजस्याची असेल तर गुन्ह्यांचे प्रमाण कमी असते मात्र वृत्तीच जर गुन्हे करण्याची असेल तर गुन्हेगारीचा आलेख वाढत असतो. एका व्यक्तीमागे एक पोलीस असेल आणि वृत्ती गुन्हेगारीची असेल तर पोलीस ठेवूनही उपयोग नसतो. कमी पोलीस असतानाही शहरांमध्ये शांतता नांदत असते, आपल्या भागातील नागरिक शांत व संयमी असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी स्वच्छ असतील तर हाताखालील कर्मचारीही त्यांचे अनुकरण करतात. त्यामुळे अधिकारी वर्गाच्या कृतीवर लोकांचा विश्वासही दृढ होण्यास मदत होते.
राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याविषयी ते म्हणाले, उच्च पदस्थ व्यक्तींबाबत पोलीस यंत्रणेने अधिक जागरुक रहायला हवे. मुंबईत घडलेली घटना ही सॉफ्ट टार्गेट’ ठरली. अशा घटना घडू नयेत यादृष्टीने यंत्रणेने अधिक सतर्क रहायला हवे.