प्रशासकीय वर्गातील रिक्त पदे भरण्यासाठीचे आदेश

रत्नागिरी:- 2016 पासून म्हणजे गेली 4 वर्षे रखडलेली नोकरभरती पुन्हा सुरू करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. वाढती बेरोजगारी लक्षात घेऊन सरकारने प्रशासकीय कार्यालयातील रिक्त पदे भरती करण्यासाठी शासन निर्णय जाहीर केला आहे. शासकीय सेवेतील रिक्त पदे लवकरच भरती केली जाणार असून त्यामुळे आता तरुण – तरुणींना नोकरीची संधी प्राप्त होणार आहे.

11 फेब्रुवारीच्या शासन निर्णयातील निर्देशानुसार राज्य सरकारने एमपीएससी परीक्षेला जास्त प्राधान्य देत लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील सरळसेवा कोट्यातील रिक्त पदे 100 टक्के भरण्यास परवानगी दिली आहे. या बाबतचा शासन निर्णय जाहीर केला आहे.

दरम्यान राज्य सरकारने प्रशासकीय विभागातील पदे भरण्यास जीआर काढला आहे. प्रशासकीय विभागातील सुधारित आकृती बंधानुसार अन्य संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील रिक्त असलेली पदे 50 टक्के भरण्यासाठी राज्याचे उपसचिव रमाकांत घाटगे यांनी जीआर काढला आहे. याबाबतची प्रत सर्व जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आली आहे. त्यामुळे आता रखडलेली पदभरती पुन्हा होऊन तरुण – तरुणीना एक सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे.