प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतून जिल्ह्यात 15 कोटींचे वाटप

रत्नागिरी:- केेंद्र शासनाने शहरी व ग्रामीण भागात प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सन 2017 पासून सुरू केली. जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागाने त्याची यशस्वी अंमलबजावणी केल्याने जिल्हयामध्ये आतापर्यंत एकूण 36 हजार 307 मातांना एकूण रु. 15 कोटी 33 लाख 16 हजार लाभार्थीच्या खात्यात या योजनेतून अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे. जिल्हयात या योजनेसाठी कोविड साथीच्या लॉकडाऊन काळातही व नागरिकांचा तसेच पात्र मातांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृ वंदना ही नवीन योजना संपूर्ण देशात 1 जानेवारी 2017 पासून कार्यान्वीत केली आहे. ही योजना केंद्र पुरस्कृत असून या योजनेमध्ये शासनाचा 60 टक्के व राज्य शासनाचा 40 टक्के सहभाग आहे. योजनेअंतर्गत कुटुंबातील पहिल्या जीवंत अपत्यापर्यंत समाजातील सर्व स्तरातील मातांना 5000/- रुपये एवढी रक्कम तीन टप्प्यामध्ये आधार संलग्न बँक किंवा पोस्ट खात्यामध्ये डीबीटीव्दारे वर्ग करण्यात येते.

योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये लाभार्थी व तिच्या पतीचे आधार कार्ड, आधार सलग्न बँक किंवा पोस्ट खाते, माता व बाल संगोपन कार्ड, बाळाचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र, बाळाचे लसीकरण कार्ड गरजेचे आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक/सहाय्यिका, आरोग्य सेविका, गट प्रवर्तक, आशा यांचा सहभाग घेण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी रत्नागिरी देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी किर्ती किरण पुजार, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी, डॉ. अनिरुध्द आठल्ये, माता बाल संगोपन अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरा डॉ. राजन शेळके, व जिल्हा कार्यक्रम समन्वयक जिल्हा परिषद रत्नागिरी प्रविण डुब्बेवार यांनी योजनेचा पात्र मातांना लाभ घेण्यासाठी आवाहन केले आहे.

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे उद्दिष्ट माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी. जन्माला येणार्‍या नवजात बालकांचे आरोग्य सुधारावे आणि मातामृत्यू व बालमृत्यू दरात घट येऊन तो नियंत्रणात रहावा. प्रसुतीपूर्व प्रसुतीपश्चात महिलेला आपली बुडीत मजूरी मिळावी यासाठी प्रधानमंत्री मातृ वंदना कार्यान्वीत केली आहे.
योजनेचे निकष पुढीलपमाणेः
शासनाने अधिसुचित केलेल्या संस्थेत( शासकिय रुग्णालये) नोंदणी केलेल्या गर्भवती महिलेस तिच्या पहिल्या जिवंत अपत्यापर्यंत एकदाच लाभ अनुज्ञेय असून, लाभाची रक्कम रु.5000/- इतकी आहे. वेतनासह मातृत्व रजा मिळवणार्‍या महिलांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय रहाणार नाही. पात्र लाभार्थी गर्भवती महिलेस खाली दर्शविल्याप्रमाणे रु.5000/- बैंक सलग्न खात्यात किंवा पोस्ट खात्याव्दारे समाजातील सर्व स्तरातील मातांना तीन टप्प्यांत जमा केली जाते.

हिला हप्ताः रु.1000/- मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून 150 दिवसांत शासकिय संस्थेत नोंदणी केल्यानंतर. दुसरा हप्ता ः रु.2000/- किमान एकदा प्रसुतीपूर्व तपासणी केल्यास किंवा गर्भधारणेचे सहा महिने तथा 180 दिवस पूर्ण होणे आवश्यक. तिसरा हप्ताः रु.2000/- प्रसुतीनंतर बाळाचे 14 आठवडयापर्यंतचे सर्व लसीकरण पूर्ण झाल्यानंतर लाभार्थीच्या खात्यात जमा केले जातात.