प्रधानमंत्री आवास योजनेत रत्नागिरी तालुक्यात धामणसे प्रथम

रत्नागिरी:- ग्रामपंचायत धामणसेला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत तालुक्यातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. धामणसेत ५१ घरकुल बांधण्यात आली आहेत. तालुक्यात केंद्र व राज्य शासन पुरस्कृत महाआवास योजनेच्या २०२४-२५ मध्ये उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतींचा व वैयक्तिक लाभार्थ्यांचा गौरव सोहळा आज स्व. शामराव पेजे सांस्कृतिक भवनात झाला.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या हस्ते धामणसे ग्रामपंचायतीचे सरपंच अमर रहाटे, तत्कालीन उपसरपंच अनंत जाधव, सदस्या सौ. ऋतुजा उमेश कुळकर्णी, सौ. वैष्णवी धनावडे, सदस्य समीर सांबरे व संजय गोनबरे, ग्रामविकास अधिकारी श्री. इंगळे यांनी सत्कार स्वीकारला. धामणसे गावातील सौ. सुवर्णा आत्माराम रहाटे यांना उत्कृष्ट घरकुल लाभार्थी म्हणून गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रकल्प अधिकारी विजयसिंह जाधव आणि गट विकास अधिकारी चेतन शेळके प्रमुख उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा ‘सबका साथ, सबका विकास’ या संकल्पनेनुसार अंत्योदयाचा विकास, शेवटच्या व्यक्तीपर्यंत शासनाचा निधी पोहोचवून खर्च करण्याचे काम सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य प्रामाणिकपणे करत असल्यानेच धामणसे ग्रामपंचायतीला हे यश मिळाले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल ग्रामपंचायत धामणसें व ग्रामस्थांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

सत्कारानंतर पत्रकारांशी बोलताना धामणसे गावचे सरपंच अमर रहाटे यांनी सांगितले की, गावकऱ्यांनी या कामांना नेहमीच सक्रिय पाठिंबा दिला असून ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या एकजुटीनेच हे यश शक्य झाले आहे. येत्या काळातही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध राहील.