रत्नागिरी:- पोलिस पडताळणी न करता ८ खलाशांना स्वतःच्या दोन बोटींवर ठेवून पोलिसांच्या लेखी आदेशाची अवज्ञा केली. या प्रकरणी बोट मालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजगर अब्दुल लतीफ कोतवडेकर (रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बोट मालकाचे नाव आहे. ही कारवाई बुधवारी (ता. १९) सायंकाळी सहाच्या सुमारास मिरकरवाडा जेटी समोरील समुद्राच्या पाण्यात एक नॉटिकल मैल अंतरावर करण्यात आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहर पोलिसांकडून ३० नोव्हेंबर २०२५ ला मिरकरवाडा जेटी व अन्य जेटीच्या ठिकाणी असलेल्या मच्छिमार बोट मालकांना त्यांच्या बोटीवर असलेल्या परराज्यातील व परदेशातील खलाशांचे पोलिस पडताळणी (व्हेरिफिकेशन) करुन घेण्याबाबत व तसे न केल्यास बोट मालकांना जबाबदार धरुन कायदेशिर कारवाई करण्यात येईल ,अशा प्रकारचा आदेश देण्यात आला होता. तसेच तसा आदेश मिळाल्याबाबत बोट मालकांच्या सह्या घेण्यात आलेल्या होत्या. प्रमाणे बोट मालकांकडून कार्यवाही होणे अपेक्षित होते. असे असतानाही संशयित अजगर कोतवडेकरने या आदेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन त्याच्या ताब्यातील दोन बोटींवर ८ खलाशांना पोलिस पडताळणी न करता ठेवून घेतले होते. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अभिजित गायकवाड यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी दिलेल्या लेखी आदेशाची अवज्ञा केल्या प्रकरणी त्याच्या संशयित बोट मालक- अजगर कोतवडेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









