रत्नागिरी:- तालुक्यातील पोमेंडी खुर्द-बौद्धवाडी येथे संरक्षक भिंत कोसळुन पाच झोपड्या मलब्याखाली गाडल्या. सुदैवाने गुरुवारी सायंकाळी ही दुर्घटना घडल्याने झोपडीत असलेले तिघे जखमी झाले. त्यामध्ये दोन लहान मुलासह एका महिलेचा समावेश आहे. ठेकेदाराकडे मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या या कष्टाळु कामगारांचा संसार काल सायंकाळी उध्वस्त झाला. पूर्वमोसमी पावसाने क्षणात होत्याचे नव्हते केले.
गेली चार दिवस जिल्ह्यात पुर्वमोसमी पावसाचा जोर कायम आहे. जून किंवा जुलै महिन्यात पडणाऱ्या मोसमी पावसाप्रमाणे मे महिन्यात पाऊस सुरू झाला आहे. या पावसामुळे संपुर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागात वीज पडण्याच्या घटना घडल्या, झाडे कोसळली, घरं, दुकानांमध्ये पाणी शिरले. महामार्गावर पाणी आले, अशा अऩेक घटना घडल्या. या पूर्वमोसमी पावसाचा असाच फटका पोमेंडी खुर्द-बौद्धवाडी येथील मोलमजुरी करणाऱ्या कामगारांना बसला. तेथील प्रविण राठोड हे रस्ते व इतर काम करण्याचा ठेका घेतात. त्यांच्या हाताखाली काम करणारे सुमारे 20 ते 25 कामगार आहे. या कामगारांनी बौद्धवाडी येथे राठोड यांच्या जागेमध्ये सात झोपड्या बांधुन राहिले आहेत. ज्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधली आहे, त्याला लागुनच खालच्या बाजुला या झोपड्या आहेत. गुरुवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास सर्व कामगार घरी आल्यानंतर चहा-पान करण्याच्या तयार होते.
काही कामगार, महिला, मुल बाहेर होते काही झोपडीत होते. अचानक संरक्षक भिंत कोसळली आणि सात पैकी पाच झोपड्या यामध्ये गाडल्या गेल्या. या घटनेने मोठा आकांतांडव झाला. आशाबाई राठोड, रोहन जाधव आणि मोहन राठोड हे तिघे या घटनेत जखमी झाले. आशाबाई राठोड या मलब्याखाली सापडल्या होत्या. बचावकार्यात त्यांना मलब्यातुन काढण्यात आले. त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. तिघांनाही उपारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. जिल्हा प्रशासनाकडुन तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. कामगार आणि मुलांची जेवणा-खाण्याची व्यवस्था केली.