रत्नागिरी:- गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या….च्या जयघोषात शुक्रवारी अनंत चतुर्दशीला गणेशोत्सवाची सांगता झाली. जिल्ह्यातील ३३ हजार ५०० घरगुती आणि ६२ सार्वजनिक गणपती मुर्तींचे विसर्जन समुद्र किनारे, नद्या-नाल्यात उत्साहात झाले. विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात केला होता.
कोकणातील गणेशोत्सवाला ३१ ऑगस्टला सुरवात झाली. दिड लाखाहून अधिक घरगुती गणपतींची उत्साहात प्रतिष्ठापना झाली. पावसानेही विश्रांती घेतल्यामुळे गणेश भक्तांचा उत्साह द्विगुणीत झाला होता. कोरोनाची बंधने नसल्यामुळे दीड लाखाहून अधिक चाकरमानी उत्सवासाठी कोकणात उतरले होते. आरत्या, भजने यासह पारंपरिक पध्दतीने या उत्सवाचा आनंद गावागावांमध्ये सुरु होता. दीड दिवस, पाच दिवसांनी गौरी-गणपती विसर्जन झाले. वामन द्वादशीला काही गणपतींना निरोप दिला. काही गावांमध्ये अनंत चतुर्दशीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. दहा दिवस पुजा-अर्चा केल्यानंतर उद्या भक्तीभावाने गणरायाला निरोप देण्याची वेळ आली.
शुक्रवारी बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या चा जयघोष करत सोबत गुलालाची उधळण आणि ढोल ताशांसह बापांची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. मांडवी परिसरात गणपतीच्या मुर्ती नेणार्या गाड्यांव्यतिरिक्त अन्य वाहनांना बंदी घालण्यात आली होती. वाहतुक कोंडी होऊन मिरवणुकांमध्ये अडचणी येऊ नयेत यासाठी प्रशासनाकडुन काळजी घेतली गेली होती. मांडवी, भाट्ये किनारी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निर्माल्य संकलनासाठी नगरपालिकेकडून किनारी भागात कलश ठेवण्यात आले होते. तसेच पालिकेची गाडी आणि कर्मचारी तिथे उपस्थित ठेवण्यात आले होते.
जिल्ह्यातील ३३,५०० अनंत चतुर्दशीला घरगुती गणेशाला निरोप देण्यात आला. त्यात रत्नागिरी शहर ११७९, ग्रामीण १५४६, जयगड ६६३, संगमेश्वर ३४४१, राजापूर ६११८, नाटे ६१५, देवरूख ११३५, सावर्डे ७७८, चिपळूण ३९८६, गुहागर ४३५०, खेड २११३, अलोरे १००, मंडणगड १७६, पुर्णगड ९६९, दाभोळे १७९ गणपती बाप्पाना निरोप देण्यात आला.