पावसाची दिरंगाई! भात शेतीचे वेळापत्रक पंधरा दिवसांनी लांबणीवर

रत्नागिरी:- जुन महिन्यातील तिन आठवडे कोरडे गेल्यामुळे जिल्ह्यातील भात शेतीच्या वेळापत्रक पंधरा दिवसांनी पुढे गेले आहे. जुन महिन्याय सरासरीनुसार 30 टक्के तर गतवर्षीच्या तुलनेत 200 मिलीमीटर कमी पाऊस झाला आहे. मागील दहा दिवसात पडलेल्या समाधानकारक पावसामुळे रखडलेल्या पेरण्या पुर्ण झाल्या असून 1500 हेक्टरवर भात लागवड झाली आहे.

जिल्ह्यात 1 जुनपासून आतापर्यंत मिलीमीटर 680 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गतवर्षी याच कालावधीत 822 मिमी पाऊस झाला होता. यंदा तुलनेत 200 मिलिमीटर कमी पाऊस झाला. जून महिन्यात सरासरी 800 मिमी पाऊस पडतो. यावर्षी तो तिस टक्के कमी पडला आहे. मोसमी पाऊस सुरु होण्यासाठी जिल्हावासीयांना प्रतिक्षा करावी लागली. पहिल्या आठवड्याच्या शेवटी काही ठिकाणी हलका पाऊस पडून गेला होता. त्यानंतर जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी तातडीने पेरण्या करुन घेतला. सुमारे दोन हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरण्या करुन घेण्यात आल्या; मात्र पुढे पावसाने विश्रांती घेतली आणि उन्हाचा कडाका सुरु झाला. बिफरजॉय चक्रीवादळामुळे पावसाचे आगमन लांबले. साधारण जुनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचे जोरदार आगमन झाले. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळले असले तरीही पेरण्यांसह भात लागवडीचे वेळापत्रकावर परिणाम झाला.

जिल्ह्यात 67 हजार हेक्टरवर भात लागवड होते. रोपवाटीकांसाठी सरासरी सात हजार हेक्टरवर पेरण्या केल्या जातात. लांबलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांनी पेरण्या उशिराने केल्या. 22 ते 23 जुनला पावसाला सुरवात झाल्यानंतर शिल्लक राहिलेल्या 60 टक्के पेरण्या पूर्ण केल्या गेल्याचे जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले. पहिल्या टप्प्यात पेरण्या केलेल्या शेतकर्‍यांनी भात लागवडीला सुरवात केली आहे. कृषी विभागाकडील माहितीनुसार आतापर्यंत 1500 हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. उशिरा पेरणी केलेल्यांना अजुन आठ ते दहा दिवस थांबावे लागणार आहे. त्यामुळे 15 जुलैपर्यंत भात लागवडीची कामे पूर्ण होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मोसमी पावसाच्या विलंबामुळे भात लागवडीला उशिर झाला आहे. भविष्यात पाऊस अनियमित राहिला तर त्यादृष्टीने होणार्‍या परिणामांचा वेध आतापासूनच घ्यावा लागणार आहे.