रत्नागिरी:- आठवडाभराची विश्रांती घेतल्यानंतर जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे. कडकडीत उनामुळे कातळावरील भातशेती पिवळी पडू लागली होती. करपा, पानं गुंडाळणारी अळी, गोगलगायींचा प्रादुर्भाव ठिकठिकाणी दिसत होता. पावसामुळे सुकलेली शेती हिरवीगार झाली आहे.
शुक्रवारी (ता. 25) सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोविस तासात जिल्ह्यात सरासरी 2456 मिलीमिटर पाऊस झाला आहे. त्यात मंडणगड 14, दापोली 32, खेड 15, गुहागर 25, चिपळूण 24, संगमेश्वर 26, रत्नागिरी 22, लांजा 27, राजापूर 10 मिमि पाऊस झाला. गतवर्षी याच कालावधीत 2950 मिमिची नोंद झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा चारशे मिमिचा फरक आहे. अलनिनोमुळे यावर्षी पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तशी वाटचाल संपुर्ण राज्यात सुरु आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीलाच पावसाने विश्रांती घेतल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली. दिवसभर कडकडीत उन पडत असल्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या भातशेतीमध्ये जमिनीला भेगा पडू लागल्या होत्या. शेती पिवळी पडली आणि करप्याचा प्रादुर्भाव ठिकठिकाणी झाला आहे. भात लावण्या झाल्यानंतर पाणी कमी पडल्यामुळे आवश्यक ताण भाताला मिळालेला नाही. त्यामुळे रोपांची वाढ झालेली नाही. जिल्हाभरात सगळीकडेच ही समस्या दिसत आहे. ज्या ठिकाणी पाणी आहे, तिथे रोपांची वाढ व्यवस्थित आहे. जिल्ह्यात 67 हजार हेक्टरवर भात लागवड करण्यात आली आहे. त्यातील सुमारे एक टक्क्याहून अधिक क्षेत्रावर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. साधारपणे सहाशे हेक्टरवर किडी व रोगांचा प्रादुर्भाव सौम्य प्रमाणात आहे. गुरवारपासून जिल्ह्यात हलक्या सरींना सुरवात झाली. शुक्रवारी सकाळीही सर पडून गेली. त्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे. परंतु पावसात जोर कायम राहिला तरच याचा उपयोग होईल अन्यथा कातळावरील शेतीला धोका निर्माण झाला आहे.