पालीनजीक डंपर- दुचाकी अपघातात खानूतील प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी:- पालीनजीक मिऱ्या नागपूर राष्ट्रीय महामार्गावर २२ मार्च रोजी रात्री बांबर फाट्यानजीक महामार्गावर बंद पडलेल्या डंपरला पाठीमागून दुचाकी स्वाराने जाऊन दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या स्वाराचे उपचारादरम्यान निधन झाले.

या अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती ती पोलिसानी सुरळीत केली. या अपघाताची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे. पाली विभागात नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून त्यावर हा अपघात झाल्याने सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित होत आहे.

या अपघातासंदर्भात पाली पोलीस दूरक्षेत्रातून मिळालेली माहिती अशी की, शुक्रवार ता.२२ मार्च रोजी मिऱ्या नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पाली गावच्या हद्दीत बांबरफाट्या नजीक पाली ग्रामीण रुग्णालयाच्या पुढील बाजूला चौपदरीकरणाचे काम सुरू असलेल्या नवीन महामार्गावर खडी वाहतूक करणारा डंपर (क्रमांक जीजे १२ बीझेड ४२४८) हा बंद पडल्याने चालक राहुल यादव याने रस्त्यावरच उभा करून ठेवलेला होता. याचदरम्यान रात्री ८.३० वाजण्याच्या दरम्यान पालीवरून खानूच्या दिशेने एक्टिवा दुचाकी क्रमांक एमएच ०८ एडी ३५४० घेऊन जाणारा संदीप भिवा सुवारे (वय ४५, रा.खानू, ता.जि.रत्नागिरी) हा या बंद पडलेल्या डंपरला पाठीमागून जोरात धडकून झालेल्या अपघातामध्ये

डोक्याला दुखापत होऊन गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला उपचारासाठी नजीकच्या पाली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात येऊन अधिक उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले असता तो मयत झाला.

या अपघातामध्ये दुचाकीचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक काही काळ खोळंबलेली होती ती पोलिसानी सुरळीत केली. या अपघातात मयत झालेला संदीप सुवारे हा सेंट्रींगचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता त्याच्या पश्चात पत्नी दोन मुले आहेत. सध्या पाली विभागात नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून त्यामध्ये सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याने अपघातांचा धोका आहे.

अपघातानंतर घटनास्थळी तातडीने पाली पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष कांबळे, मोहन कांबळे यांनी जाऊन जखमीला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले.अपघाताची खबर डंपर चालक राहुल डोमी यादव रा. बगडी ईसापुर, भागलपूर,राज्य बिहार, सध्या रा.नाणिज,रत्नागिरी यांनी दिली असून अपघाताची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत पाली पोलीस दूरक्षेत्रात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.