पालीजवळ अपघातात जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी:- पालीनजीक मिऱ्या नागपूर राष्ट्रीय महामार्गावर गेल्या २२ मार्च रोजी रात्री झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या संदीप भिवा सुवारे (वय ४५, रा. खानू, ता. रत्नागिरी) या दुचाकीस्वाराचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

या अपघातासंदर्भात पाली पोलीस दूरक्षेत्रातून मिळालेल्या माहितीनुसार २२ मार्च रोजी मिऱ्या नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पाली गावात बांबर फाट्यानजीक पाली ग्रामीण रुग्णालयाच्या पुढील बाजूला चौपदरीकरणाचे काम सुरू असलेल्या नवीन महामार्गावर खडी वाहतूक करणारा डंपर (क्र. जीजे १२ बीझेड ४२४८) बंद पडल्याने चालक राहुल यादव याने रस्त्यावरच उभा करून ठेवला होता. याचदरम्यान रात्री ८.३० वाजण्याच्या दरम्यान पालीहून खानूच्या दिशेने दुचाकीने (क्र. एमएच ८ एडी ३५४०) निघालेला संदीप भिवा सुवारे हा दुचाकीस्वार बंद पडलेल्या डंपरला पाठीमागून जोरात धडकला. या अपघातात त्याला डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी नजीकच्या पाली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तेथे उपचार सुरू असताना त्याचा बुधवारी मृत्यू झाला.त्या अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती. ती पोलिसांनी सुरळित केली. या अपघाताची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.