रत्नागिरी:- वाडामधील शिक्षक सामाजिक काम म्हणून 365 दिवस शाळा चालवतो. राज्यातील काही शाळांमधील विद्यार्थी 1365 चा पाढा म्हणतात. काही विद्यार्थी डाव्या हाताने इंग्रजी तर उजव्या हाताने मराठी लिहितात. असे नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्ह्यातील 5 हजार 830 शिक्षकांपैकी किती शिक्षकांनी केले आहेत ? प्रधानमंत्री श्री अंतर्गत खर्च झालेल पैशातून काय काम केले ? पटसंख्या वाढविण्यासाठी काही वेगळे उपक्रम केलेत का ? याबाबत पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज शालेय शिक्षण विभागाचा सविस्तर आढावा सोमवारी घेतला.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या आढावा बैठकीस अतिरिक्त् मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव, शिक्षणाधिकारी बी. एम. कासार, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुध्द आठल्ये, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, प्र. माध्यमिक शिक्षणाधिकारी सुनिता शिरभाते, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने, बाबू म्हाप, बिपीन बंदरकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सामंत यांनी श्री. यादव यांनी केलेल्या संगणकीय सादरीकरणातील मुद्दयांवर सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले, वाडामधील एका शिक्षकांने शाळेमध्ये विश्रांतीगृह निर्माण केले आहे. झोप आलेल्या मुलांना वडलांप्रमाणे तो त्यांना झोपवतो. झोप पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्याला शिकवले जाते. सामाजिक काम म्हणून 365 दिवस शिकविण्याचे तो काम करतो. कोणत्याही संघटनेत काम करत नाही. हातखंबा शाळेतील गुरव नावाचा शिक्षक ज्या शाळेत जातो, तेथे बाग तयार करतो. काही शाळातील मुलं इंग्रजी आणि मराठी दोन्ही लिखाण एकाचवेळी करतात. अशा नाविन्यपूर्ण उपक्रम करणाऱ्या शिक्षकांचे मार्गदर्शन ठेवायला हवे. असे शिक्षक शोधा, वर्षभरात मुलांकडून राज्यात आदर्श निर्माण होईल, असे काम करा.
प्रधानमंत्री श्री उपक्रमात 13 शाळांमध्ये किती पैसे खर्च झाले? कशावर खर्च झाले? मिरकरवाड्यातील शाळेवरही झालेल्या खर्चाबाबत 15 दिवसात अहवाल द्या. 13 शाळांसाठी दिलेल्या निधी बाबत मुख्याध्यापकांकडून सविस्तर अहवाल घ्यावा. यामध्ये काही गैरप्रकार आढळला तर संबंधितांवर फौजदारी दाखल करण्यात येईल.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत कृती कार्यक्रम, स्मार्ट स्कूल मोहीम आणि जिल्हा परिषदेच्या 13 फ्लॅगशिप कार्यक्रमांबाबत पालकमंत्र्यांनी सविस्तर आढावा घेतला. नैसर्गिक वाढ असणाऱ्या पटसंख्येबाबत शाळेची परवानगी थांबता कामा नये, असे सांगून पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, पोषण आहाराबाबत ॲप तयार करावे. शालेय प्रवेशोत्सवाबाबत ज्या अधिकाऱ्यांनी शाळा भेटी दिलेल्या नाहीत, अशा अधिकाऱ्यांचा अहवाल सादर करावा. ज्या शाळांमध्ये पटसंख्या वाढलेली आहे, याबाबतची माहिती गावागावात जाऊन सांगितली पाहिजे. पटसंख्या वाढविण्यासाठी अभिनव उपक्रम करायला हवेत. इस्त्रो आणि नासाला सोबत पाठविताना शिक्षकांमध्येही स्पर्धा घ्यावी, असेही पालकमंत्री म्हणाले.