रत्नागिरी:- पालकमंत्री अधिकारांचा वापर करीत शासकीय अधिकार्यांना हाताशी धरुन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्थानिक पदाधिकार्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. या पद्धतीने त्रास देणे बंद नाही केले तर खासदर विनायक राऊत व शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरुन जशासतसे उत्तर देऊ असा इशारा शिवसेना उपनेते व राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी दिला.
मुंबईला जाताना रेल्वेस्थानक परिसरात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, जिल्ह्याचे पालकमंत्री विशेषत: रत्नागिरी तालुक्यामध्ये शासकीय अधिकार्यांच्या माध्यमातून स्थानिक पदाधिकार्यांना त्रास दिला जात आहे. भविष्यात अशा तरेचा त्रास देण्याचा प्रयत्न सुरुच राहिल्यास जशाच तसे उत्तर दिले जाईल. ठाकरेंच्या शिवसेनेला वाढता पाठींबा लक्षात घेता, त्यांच्या पायाखालील वाळू सरकली असावी व भविष्यातील धोका दिसत असता म्हणून हा त्रास दिला जात असावा. चिरेखाण मालक, ठेकेदार व अन्य व्यावसायिकांना जाणूनबुजून त्रास देण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आमदार राजन साळवी यांनी केला. राज्यपातळीपासून जिल्हा व तालुकापातळीपयर्र्त पक्षात पदाधिकारी येत नसल्याने त्रास देण्याची भूमिका सुरु असल्याचेही आमदार साळवी यांनी सांगितले.
जिल्ह्यात 222 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या असून यामध्ये जास्तीतजास्त ग्रामपंचायतीवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरेंचा भगवा फडकेल असा विश्वासही आमदार साळवी यांनी व्यक्त केला. आपण शिंदे गटात जाणार असल्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांना आपण रत्नागिरीतील विश्रामगृहामध्ये मतदार संघातील कामासाठी भेटलो होतो आणि हे जाहीररित्या भेटलो. आपण लपूनछपून भेटलेलो नाही. ते पालकमंत्री आहेत, मतदारांची कामे करणे हे माझे काम आहे. त्यामुळे विकास कामांसाठी आपण भेटलो व त्यांनीही कामे मंजूर केली असल्याचे आ. साळवी यांनी सांगितले.
नाणारमध्ये नागरिकांची घरे, मंदिरे जात होती. त्यामुळे ग्रामस्थांचा विरोध होता. बारसु-सोलगावमध्ये घरे, मंदिरे जात नसून ग्रामस्थांचा पाठिंबा आहे. विरोध करणार्यांची भूमिका समजावून घेतली जाईल. यापूर्वी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बारसूसाठी सकारत्मकता दाखवून केंद्राशी पत्रव्यवहार केला होता. त्यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई होते आणि आता रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडेच उद्योगमंत्रीपदाचा कारभार आहे. हा प्रकल्प झाल्यास राजापूरच्या विकासाला वेग मिळेल. त्याचप्रमाणे जिल्ह्याचा विकास होईल, त्यामुळे रिफायनरीसाठी आपले उद्योगमंत्र्यांना सहकार्य असल्याचे आ. साळवी यांनी स्पष्ट केले.