रत्नागिरी:- रत्नागिरी- नागपूर मार्गावर पानवल येथे तीन वाहनांचा आज दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. एसटी बसने पुढे असणाऱ्या दोन वाहनांना मागून जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र दोन वाहनांचे नुकसान झाले आहे.
सविस्तर वृत्त असे की, रत्नागिरीहून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी रत्नागिरी- कोल्हापूर- गडहिंगलज ही एसटी बस पानवल स्टॉप जवळ आली असता पुढे असणाऱ्या किया (MH- 08 AX -5655) गाडीला जोरदार धडक दिली. त्यानंतर ही कार पुढील इनोवा (MH- 08AG -0281) गाडीवर धडकली. अशी तीन वाहने जोरदार धडकल्याने अपघात झाला. सुदैवानं या अपघातात एक ही व्यक्ती जखमी झाली नसली तरी गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एसटीने धडक दिलेल्या किया गाडीचे मोठे नुकसान झालेले आहे.
अपघातांची माहिती मिळताच घटनास्थळी हातखंबा वाहतूक पोलीस आणि ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली. अपघातानंतर मोठी गर्दी झाली होती. काही काळ वाहतूक थांबली होती. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी इतर वाहनांना रस्ता मोकळा करून दिला.