रत्नागिरी:- चांदसुर्या ते पानवल-घवाळीवाडीकडे जाणार्या रस्त्यावरील अंतर्गत सार्वजनिक रस्ता बंद केल्याप्रकरणी एका विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवार 7 जुलै रोजी सकाळी 9.45 ते 10.15 वा. कालावधीत घडली आहे.
गिरीश विलास मुळ्ये (रा.पानवल,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात तनिष्का भाग्यवान होरंबे (26,रा.पानवल होरंबेवाडी,रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यानुसार,मंगळवारी सकाळी संशयिताने चांदसुर्या ते पानवल घवाळीवाडी असा जाणारा ग्रामपंचायत रजिस्टर वरील रस्त्याच्या ठिकाणी गौतमनगर कमानी ते गौतम नगर वस्तीमध्ये जाणार्या रस्त्यावर जांभा दगडाचे चिरे ठेवून सार्वजनिक रहदारीच्या रस्त्यावर अडथळा करुन तो बंद केला. याप्रकरणी त्याच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 126(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.