रत्नागिरी:- पालिकने पाणीपट्टी थकविणाऱ्यांवर आता कठोर कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत ५४ तर काल ११ थकबाकीदारांच्या नळ जोडण्या तोडल्या. वेळेत पाणी पट्टीभरून ही कठोर कारवाई टाळा, असे आवाहन पालिकेने केले आहे. एकुण साडे ४ कोटीपैकी ५५ टक्के पाणीपट्टी वसुली पालिकेने केली आहे.
रत्नागिरी पालिकेने पाणीपट्टी वसुलीवर अधिक भरदिली आहे. कठोर कारवाई करण्यापूर्वी शेकडो
नळधारकांना पंधरादिवसाची नोटिस देण्यात आली होती. त्यानंतरही अनेकांनी पाणीपट्टी भरण्यास
टाळाटाळ केली. अशा थकबाकीदारांवर आजपासून नळ जोडणी तोडण्याची कारवाई पाणीपट्टी वसुली
पथकाने सुरू केली आहे. शहरातील सुमारे साडे नऊ हजार नळ जोडणीधारकांकडुन पालिकेला दरवर्षी
अडिच ते तीन कोटी रुपये कर मिळतो. परंतु कोरोना काळातील थकबाकी धरुन ही वसुली आता साडे चार कोटीवर केली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून पाणीपट्टी थकविलेल्या ५४ जणांवर आतापर्यंत नळ जोडणी तोडण्याची कारवाई केली आहे. नोटिसा देऊनही नागरिकांनी त्याला दाद न दिल्यामुळे आजपासून पुन्हा पालिकेने कारवाई सुरू केली आहे. थकीत असलेल्या ११ नळ जाडणीधारकांची कनेक्शन पालिकेने तोडली. ही कारवाई अशी पुढे सुरू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळीच पाणीपट्टी भरून पालिकेला सहकार्य करावे आणि कटु कारवाई थांबवावी, असे आवाहन पाणी विभागाचे अधिकारी नंदकुमार पाटील यांनी केले आहे.
सुट्टीतही पालिका कार्यालय उघडे
रत्नागिरी पालिकेने मालमत्ता व पाणीपट्टी कर दात्यांना आवाहन केले असून सुट्टीच्या दिवशीही कर
भरण्यासाठी पालिकेचे कार्यालय सुरू राहणार आहे. १८, १९, २५, २६ आणि ३० मार्चला सुट्टीच्या दिवशी
पालिकेचे कार्यालय सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त करदत्यांनी करभरणा करावा, असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक तुषार बापर यांनी केले आहे.