चिपळूण, खेड, लांजा, राजापूरसह संगमेश्वर तालुक्यातील गावांचा समावेश
रत्नागिरी:- केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल यांनी पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यासाठी अधिसूचना प्रसिध्दीसाठी देण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण मधील ४४ खेड मधील ८५, लांजा मधील ५०, राजापूर मधील ५१ व संगमेश्वर मधील ८१ अशी एकूण पाच तालुक्यातील ३११ गावांचे क्षेत्र पर्यावरण संवेदनशील म्हणून घोषित केली आहे. या मसुदा अधिसूचनेत नमूद केल्यानुसार क्षेत्रातील ज्या स्थानिक रहिवासी यांना परिणाम होणार आहे त्यांनी ६० दिवसांच्या आत हरकती नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ नागपूर चे सदस्य सचिव तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याकडील केंद्र शासनाचे पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाचे अधिसूचना पत्रासह प्राप्त झाले आहे. त्यानुसार चिपळूण, खेड, राजापूर, रत्नागिरी उपविभागीय अधिकारी तसेच तहसिलदार चिपळूण, खेड, लांजा, राजापूर व संगमेश्वर यांना ही अधिसूचना स्थानिक पातळीवर प्रसिध्द करुन अधिसूचनेबाबत हरकतीचा अहवाल सादर करण्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.









