आमदार जितेंद्र आव्हाड यांचे प्रतिपादन
रत्नागिरी:- काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्यावेळी कोणतीही सुरक्षा पर्यटकांना नव्हती. आतंकवादी येतात व निघून जातात हे सुरक्षा यंत्रणांच अपयश आह़े सरकारच्या चुकीमुळे 26 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्विकारायला हव़ी मुंबइतील दहशतवादी हल्ल्यावेळी गुप्तचर यंत्रणा कुचकामी ठरल्याचा ठपका ठेवून तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांचा राजीनामा भाजपने मागितला होता. आता तिच नैतिकता केंद्रीय गृहमंत्र्यांनी दाखवायला हव़ी असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने रत्नागिरीत कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी रत्नागिरीत आलेले आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथे पत्रकारांशी संवाद साधला. पहलगाम येथे हल्ला झाल्यानंतर दोन तासानंतर सैनिक त्याठिकाणी पोहचले, सुरक्षेची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. आपल्या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा सर्व प्रकार धक्कादायक आहे. या सर्व प्रकाराची नैतिक जबाबदारी सरकारची आह़े 26/11 मुंबई हल्ल्यानंतर मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी राजीनामे दिले होते असे आव्हाड यांनी सांगितल़े
पहलगाम हल्ल्यानंतर धार्मिक द्वेश पसरविण्याचे काम सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आले. देशात सर्व गुण्यागोविंदाने राहत असताना राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार केला जात आह़े जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी विविध मुद्दे उपस्थित केले जात आहेत. जनतेची सुरक्षा करणे हे सरकारचे काम आह़े सरकारने कोणतीही भूमिका घ्याव आम्ही त्यांच्या सोबत राहू मात्र प्रश्न विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे. एवढा हल्ला झालाच कसा याचे उत्तर सरकारने द्यायला हवे.
राज्यावर सध्या 9 लाख कोटी कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे, प्रत्येक नागरिकावर जवळपास दिड लाख रुपयांचे कर्ज आह़े त्यामुळे सरकार लाडकी बहिण योजना बंद करण्याच्या मार्गावर आह़े अर्थमंत्री अजित पवार हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफिची घोषणा आपण केलीच नव्हती असे सांगतात. त्यामुळे सरकाला पाशवी बहुमत मिळाले असून जनतेची गरज आता संपली असल्याची टिका आव्हाड यांनी यावेळी केली.
सरकरचे मंत्री जातीय द्वेश पसरवित आहेत. संविधानाची शपथ घेवून आपण मंत्री झाला आहात याचा त्यांना विसर पडला आहे. सर्वोच्च न्यायालयावर टिका करण्यापर्यंतचे धाडस मंत्री करत असून आपल्या मर्यादांचा त्यांना विसर पडला आहे. भाजपाचे लोक तर्क समजून घेत नाही केवळ धार्मिक विद्वेश पसरविणे एकढेच काम केले जात आहे. महागाई आज गगनाला भिडली आहे, बेरोजगारी वाढली आह़े त्याकडे लक्ष देण्यास सरकारला वेळ नाही.
जातीनिहाय जनगणना करण्याला आमचा कायमच पाठिंबा राहिला आहे. तसेच जिसकी जितनी संख्या भारी, उतनी उसकी भागिदारी या काशिराम यांच्या न्यायाने संपत्तीचे वाटप झाले पाहिजे. न्यायव्यवस्थेत देखील आरक्षण असले पाहिजे. राज्यात सरकारला पेट्या पोहचत असल्याने यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायच्या नाहीत़ अशी टिका आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केली.