रत्नागिरी– कोकणात गेल्या आठवड्यापासून प्रचंड पाऊस पडतोय. या पावसामुळे दरड कोसळल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. विशेष म्हणजे दरड कोसळल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट हा सध्या बंद आहे. परशुराम घाट आज पुन्हा सुरु होईल आणि त्या मार्गाने वाहतूक सुरु होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. पण मुसळधार पावसामुळे प्रशासनाने पुढचे आणखी तीन दिवस परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे दुर्गवाडी येथील डोंगराच्या तडा आणखी वाढू लागल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. याशिवाय कोकणात 12 जुलैपर्यंत पावसाबाबत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
त्यामुळे परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. प्रशासनाने याआधी परशुराम घाट 9 जुलैपर्यंत बंद राहणार असल्याचं जाहीर केलं होतं. पण आता संभाव्य धोका लक्षात घेऊन हा मार्ग 12 जुलैपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यात 8 जुलै ते 12 जुलै दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
त्यामुळे परशुराम घाटात दरड कोसळण्याची भीती आहे. याच पार्श्वभूमीवर दरड कोसळून संभाव्य जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी प्रशासनाने संबंधित मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (अखेर दिल्लीच्या बैठकीत ठरला फॉर्म्युला; गुरुपौर्णिमेला शिंदे सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता) या दरम्यान पर्यायी वाहतूक ही चिरणी-आंबडस-चिपळूण या पर्यायी मार्गे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण फक्त हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी या मार्गाला परवानगी असणार आहे.
खेड तालुक्याचा विचार करता वाहतूक सोयीसाठी चिपळूनकडून खेडकडे येणाऱ्या हलक्या वाहनांसठी कळंबस्ते-आंबडस-शेल्डी – आवाशी आणि चिपळूणकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांसाठी पर्यायी रस्ता पिरलोटे-चिरणी-आंबडस फाट-कळंबस्ते फाटा यावरुन एकेरी वाहतूक मार्गस्त करण्यात यावी, अशा सूचना प्रशासनाकडून जारी करण्यात आल्या आहेत. दरम्यान, परशुराम घाट महामार्गावरील चौपदरीकरणाचं काम करण्यासाठी 25 एप्रिल 2022 ते 25 मे 2022 या कालावधीत या महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. वाहतूक बंदी कालावधीत फक्त कमी वजनाची वाहतूक आमडस-चिरणी-लोटे रस्ता कळंबस्ते-आमडस-धामणंद या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. चौपदरीकरणाच्या कामामध्ये अडथळा निर्माण होऊ नये आणि कामाला गती मिळावी तसंच पावसाळ्यापूर्वी धोकादायक क्षेत्रातील काम पूर्ण व्हावे यासाठी घाट बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला होता.