रत्नागिरी:- ज्या जिल्हा परिषद शाळांनी लाखो विद्यार्थ्यांना लोकशाहीचे धडे दिले त्यातील अनेक शाळा शासन, लोकप्रतिनिधी आणि पालकांच्या अनास्थेमुळे बंद झाल्या. मात्र आता याच शाळा निवडणुकीच्या कारणामुळे एक दिवसासाठी का होईना सुरु होणार आहेत. जिल्ह्यात 1 हजार 500 प्राथमिक शाळांची मतदान केंद्र म्हणून निवड करण्यात आली आहे. सध्या या शाळांची रंगरंगोटी सुरु झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातही जि. प. च्या शेकडो शाळा बंद झाल्या आहे. मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या मतदानामुळे शासनाला त्या अडगळीत पडलेल्या शाळांची आठवण झाली आहे. रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील जि. प. च्या 1 हजार 500 शाळा निवडणूक मतदान केंद्र म्हणून निवडण्यात आल्या आहेत. यातील 30 पेक्षा जास्त बंद शाळाही निवडणुकीसाठी मतदान केंद्र म्हणून वापरण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील बंद पडलेल्या जिल्हा परिषदेच्या सुमारे 30 शाळा लोकसभा मतदारसंघातील 7 मे रोजी मतदानाच्या दिवशी पुन्हा उघडणार आहेत. त्यापैकी अनेक शाळांची पडझड झाली आहे. त्या शाळा दुरुस्तीसह रंगविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पटसंख्येअभावी जिल्ह्यातील अनेक शाळा बंद पडल्या आहेत. 2019 नंतर 5 वर्षांत शाळा बंद असल्यामुळे दुरुस्तीकडे लक्ष दिलेले नाही, त्यामुळे त्या शाळांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. या शाळांची गरज मतदानाच्या दिवशी आहे.
मतदानाच्या दिवशी निवडणूक अधिकार्यांसह मतदारांची गैरसोय होऊ नये याकरिता जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील जि. प. च्या 1 हजार 500 शाळा मतदान केंद्र म्हणून निवडल्या आहेत. या शाळांची पाहणी करण्यात आली. ज्या शाळांची दुरुस्ती, रंगरंगोटी करणे आवश्यक आहे, त्यांची रंगरंगोटी व दुरुस्तीचे काम जिल्ह्यात अनेक ठिकाणी सुरु आहे. बंद पडलेल्या शाळा गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्षित होत्या. शाळांच्या परिसरातदेखील कोणीच फिरकत नव्हते. मात्र निवडणुकीच्या निमित्ताने या शाळांची शासनाला आठवण झाली आहे. मतदान करण्यासाठी येणार्या मतदारांना जवळच मतदान केंद्र असावे, याकडे प्राधान्याने लक्ष देण्यात आले आहे. त्यानुसार गावातच बंद पडलेल्या शाळांची दुरुस्ती करण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे बंद पडलेल्या शाळांना नवीन झळाळी येणार असून एक दिवसासाठी तरी शाळा सकाळी 7.30 वा. पासून सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत केंद्र अध्यक्षांपासून शिपाई व मतदारांनी गजबजणार आहेत.









