पंधरा दिवसात ८३ हजार २६४ जणांची तपासणी

अतिसार नियंत्रण पंधरवडा; ७ टक्के मृत्यू अतिसारामुळे

रत्नागिरी:- पाच वर्षापर्यंतच्या बालकांच्या मृत्युमध्ये अतिसार हे प्रमुख कारण आहे. ७ टक्के मृत्यू हे अतिसारामुळे होतात आणि अशा मृत्युचे प्रमाण उन्हाळयात व पावसाळयात जास्त असते. हे टाळण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात १ ते १५ जुलै या कालावधीत विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या पंधरा दिवसात ८३ हजार २६४ जणांची तपासणी करण्यात येणार आहे, असे जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी सांगितले.

अतिसार झालेल्या सर्व मुलांना ओआरएस पाकिट व झिंक गोळयांचे वाटप होऊन लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल हे सुनिश्चित करणे.  अतिजोखमीची क्षेत्रे आणि दुर्बल घटकांवर विशेष लक्ष केंद्रित करणे.  पाच वर्षाखालील मुलांच्या अतिसार प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी पालकांचे व काळजी घेणार्‍यांचे योग्य समुपदेशन करणे असे उद्देश या संदर्भात ठेवण्यात आले आहेत. या उपक्रमांतर्गत जनजागृती, अतिसारामध्ये घ्यावयाची काळजी, ओआरएस व झिंक गोळयांचा वापर कसा करावयाचा याची प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत. तसेच आरोग्य केंद्रामधील पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करण्यात येईल. आरोग्य संस्थांमध्ये ओआरएस व झिंक कॉर्नरची स्थापना करण्यात येईलपाच वर्षाखालील मुले असलेल्या कुटुंबाना आशा स्वयंसेविकामाफत ओआरएस व झिंक गोळयांचे घरोघरी वाटप करण्यात येईल. अतिसार झालेल्या बालकांचा शोध घेणे व त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. अतिसाराची लक्षणे धोक्याची चिन्हे तसेच नियमानुसार उपचार पध्दती व आवश्यक वाटल्यास संदर्भ सेवा देण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. ग्रामस्तरावर आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांचेमाफत हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.